Friday 21 May 2021

पाण्याकाठचंघर २

बेल्जियममधल्या कोरोना संबंधित बातम्या लिहायचं टाळत होते कारण त्या फार भिववणाऱ्या आहेत. पण अनेकांनी उत्सुकता दाखवली म्हणून आज थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करते. मी जे काही लिहीत आहे त्यावरून भारत आणि बेल्जियम अशी तुलना करू नये. भौगोलिक परिस्थितीपासून लोकसंख्येपर्यंत कोणतीच गोष्ट समान नसताना ती तुलना योग्य ठरणार नाही.

दुसरं म्हणजे मी जे लिहितेय ते माझ्या लॉकडाऊनच्या काळातल्या घराबाहेरच्या मर्यादित वावरातून आणि इथली बातम्या देणारी माध्यमं जे चित्र दाखवताहेत त्या अनुभवावर आधारित आहे. डच भाषा येत असली तरी राजकारणातले इथले अंडरकरंट्स मला समजत नाहीत त्यामुळे इंग्रजी आणि डच मीडियात जे येतंय त्यातून समजलेल्या या गोष्टी.
शेवटचं , मी कोणी एक्स्पर्ट नाही तर लॉकडाऊन मध्ये अडकलेली, इथे परदेशी नागरिक असलेली सामान्य गृहिणी आहे. त्यामुळे या लेखनाकडे त्याच दृष्टीने बघितले जावे.
नमनाचं तेल संपलं.
फेब्रुवारीमध्ये भारतात घरी गेले होते. तिथून परत आले 7 मार्चला. प्रवासात रिकामं असलेलं झुरीक आणि ब्रुसेल्सचं विमानतळ बघून काहीतरी भयंकर पुढे वाढून ठेवलं आहे याची कल्पना आली होती. त्या दिवशी स्विस मध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 5 केसेस सापडल्या होत्या आणि बेल्जियम मध्ये 3 !
घरी आल्यावर नॉर्मल रूटीन सुरू झालं. दोन दिवसांनी ग्रोसरीला गेले तर तिथेही वर वर सगळं नेहमीसारखं दिसत होतं. इथं आल्यापासून कोणा स्थानिक मित्र मैत्रिणीशी बोलणं झालं नव्हतं आणि बातम्याही बघितल्या नव्हत्या.
सगळ्या लोकांच्या शॉपिंग कार्ट मध्ये प्रचंड सामान दिसत होतं.
ग्रोसरीतून परत येताना एक ओळखीचं जोडपं भेटलं आणि नेहमीप्रमाणे गळ्यात न पडता शक्य तितक्या दूर उभं राहून आम्ही बोललो.
माझ्याकडून पैसे घेतल्यावर ग्रोसरने सॅनिटायझर लावून हात स्वच्छ केले.
आमच्या लेकीचे खूप लाड करणारे शेजारी एवढ्या दिवसांनी ती दिसत असूनही लांबून बोलून गेले.
एका खोकत असलेल्या माणसाला लोक वळून वळून बघत होते.
दुसऱ्या दिवशी गावातच 3 केसेस सापडल्याची बातमी आली आणि हा वणवा वेगात पेटत गेला. 12 तारखेला लॉक डाऊनची कल्पना देण्यात आली. त्यात काय बंद होणार,काय उघडं राहणार,कोण घरून काम करायचं आहे कोणी कामावर जायचं आहे, बाहेर वावरताना कोणते नियम पाळायचे आहेत ते मोडले तर काय शिक्षा असणार आहे याच्या स्पष्ट सूचना होत्या.
15 तारखेला लॉकडाऊन सुरू. गावातले सगळे रस्ते ओस पडले.पोलिसांची गस्त सुरू झाली.
ग्रोसरी स्टोअर्समध्ये जेष्ठ नागरिक, विशेष गरजा असलेले आणि फ्रंट लाईनर्स यांच्यासाठी वेगळी वेळ,वेगळी रांग ठरवून दिली. एका दुकानात एका वेळी किती लोक जाऊ शकतात हे ठरवलं आणि जास्तीत जास्त 30 मिनिटे ही मर्यादा सूचना म्हणून लिहिली गेली.
कुठेही गर्दी गडबड दिसली नाही तरी लोक पॅनिक होऊन साठेबाजी करत होतेच. दूध,फ्रोजन फूड,टॉयलेट पेपर,बटाटे आणि पास्ता हे भराभर संपत होतं. हे सगळ्यांना सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळतील असं सरकारने सांगितल्यावर 8 दिवसांनी कमी झालं !
पुढचे दिवस रोज सकाळी कोरोना केसेस वाढल्याच्या बातम्या बघायच्या आणि कामाला लागायचं असं रूटीन झालं.
इथे जेष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येत जास्त आहे. त्यातही एकटे राहणारे लोक खूप.
एक पत्रक टपालात आलं त्यात लिहीलं मेयरने या लोकांसाठी गप्पा मारायला, मन मोकळं करायला हेल्पलाईन सुरू केली असं कळलं.
ज्यांना घराबाहेर जाणं शक्य नाही त्यांना घरपोच अन्न देणारी संस्था कामाला लागली.
स्थलांतरित,होमलेस आणि राजकीय शरणार्थी यांच्यासाठी वेगळी सोय केली होती. त्यांच्यासाठी काही ngo मदत गोळा करत आहेत.
व्यायाम म्हणून चालणं पळायला जाणं, कुत्रे फिरवणे याला परवानगी आहे. सायकलिंग पण चालू आहे.
फ्रंट लाइनर्स च्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी शाळांनी घेतली आहे. फक्त यांची मुलं शाळेत जातात आणि दिवसभर तिथेच थांबतात.
आणि
रोज संध्याकाळी 8 वाजता आपल्या दारात येऊन फ्रंट लाइनर्ससाठी प्रोत्साहन, कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याची विनंती केली होती. जे एक दिवसही खंड न पडता आजही सुरू आहे.
इथे चर्चचा पगडा आहे. त्यांनी प्रार्थना म्हणून घरासमोर पांढरी कापडं लावा असं सांगितल्याने कधी नव्हे ते घरासमोर पांढऱ्या चादरी,टॉवेल, पडदे लटकवलेले दिसताहेत.
या सगळ्यात काहीच वाईट घडत नव्हतं असं नाही.
सगळ्यात वाईट होतं वैद्यकीय उपचारासाठी जागा आणि साधनं कमी असणं. अगदी अत्यवस्थ असाल म्हणजे श्वासच घेता येत नसेल तर आणि तरच दवाखान्यात या अन्यथा घरीच वेगळे रहा अशा सूचना होत्या. त्या आधी डॉक्टर फोनवरून बोलत होते.
टेस्ट करण्यासाठी नेमके काय निकष आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीतच नव्हतं.
केअर सेंटरमध्ये राहणाऱ्या वृद्धांना भेटायची परवानगी नाकारावी लागत होती कारण कोरोना संसर्ग त्यांना व्हायची भीती!
गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या अंगावर थुंकणे, चोऱ्या करणे, 300 लोक जमवून लॉकडाऊन पार्ट्या करणे, पोलिसांची वाहनं जाळणे तोडफोड हे सगळं कुठे कुठे चालूच आहे. लोकांनी पार्कमध्ये जमून खेळायला सुरुवात केली. ते ऐकेनात तेव्हा पार्क बंद केले.
शेतकऱ्यांचं, उद्योगजगताचं आणि पर्यटन क्षेत्राचं नुकसान हे प्रचंड फ्रस्ट्रेट करणारं आहे.
असं सगळं काळं पांढरं चालू आहे.
आता मात्र केसेस आटोक्यात आल्यात.
एकूण 50781 लोक कोरोना पोजिटिव्ह, 8415 लोक मृत्युमुखी पडले, ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घेऊन (?) बरे झाले 12980 लोक ! ट्रीटमेंट न घेता आपोआपच बरे झाल्याच्या केसेसही अनेक आहेत.
आता लॉक डाऊन उठवण्याच्या दुसऱ्या टप्प्यात काय होणार ते आज कळलं आहे.
त्यानुसार सोमवारी सगळी दुकानं उघडतील. रांगेचे नियम, मास्क अनिवार्य !
रेस्टॉरंट, कॅफे, बार आणि स्पोर्टक्लब उघडणार नाहीत. आठवडे बाजार बंदच राहील.
सार्वजनिक वाहनातून जाताना मास्क अनिवार्य असेल. ते मास्क रेल्वे स्टेशनवर वेंडिंग मशीन मधून मिळताहेत व एका मास्क ची किंमत 15 युरो एवढी जास्त आहे! हा मास्क 500 वेळा वापरता येईल असा आहे म्हणे.
घरासमोर कालव्यात होड्या पुन्हा दिसू लागल्यात.
सायकलिंग करणारे लोक जास्त दिसत आहेत.
काल पार्क पण उघडे होते आणि विशेष गर्दी नव्हती.
आम्हाला ब्रुसेल्स किंवा अँटवर्पवरून भारतीय किराणा मागवावा लागतो. गेले दोन महिने ते आणून देणारा दुकानदार येत्या रविवारी येऊ शकणार आहे.
प्राथमिक शाळा आता थेट सप्टेंबर मध्ये उघडणार आहेत.
अजूनही शक्य त्या लोकांनी घरी बसूनच काम करायचं आहे.
एकाच कुटुंबातील 4 लोक दुसर्याकडे भेटायला जाऊ शकतात. पण त्यांनी घर ते घर प्रवास करावा इतर कुठेही जाऊ नये अशा सूचना आहेत.
हे सगळं सांगून पंतप्रधान म्हणतात,"तुम्ही हे नियम पाळत आहात की नाही हे बघायला आम्ही येऊ शकणार नाहीत. पण तुमच्या विवेकबुद्धीवर आमचा (सरकारचा) विश्वास आहे!"
अशा प्रकारे आता आम्ही "नवीन नॉर्मल" जग उघडण्याची वाट बघत आहोत.

८ मे २०२०

No comments:

Post a Comment