Showing posts with label भटकंती. Show all posts
Showing posts with label भटकंती. Show all posts

Wednesday, 21 October 2020

शेतकरी बाजार

इथेही दर दोनचार गावांमध्ये मिळून एक शेतकरी बाजार असतो. प्रत्येक गावी भरणाऱ्या आठवडी बाजारापेक्षा हा वेगळा. इथं फक्त शेतकरी आपापल्या शेतातली उत्पादनं थेट ग्राहकांना विकू शकतात.बटाटे,अंडी,चीज लोणी,सुकवलेलं मांस,लोणची,स्वतःच्या शेतात पिकवलेल्या भाजीपाला यात टोमॅटो, अस्परागास, विटलोफ,पालकाचे प्रकार,मश्रूम आणि कोबीचे कितीतरी प्रकार असतात. फळांमध्ये स्ट्रॉबेरी,रास्पबेरी इ बेरीज,द्राक्षे, सफरचंद आणि पेअर.बाकी फळं कमी असतात. आपल्याकडे बसतात तसे ताडपत्री अंथरून भाज्या, फळं यांचे छोटे छोटे ढीग करून लोक ओरडून आपल्या शेतमालाची जाहिरात पण करत असतात. मात्र इथं कोणी घासाघीस करताना दिसलं नाही.बहुतेक सगळ्यावर किंमत लिहिलेला कागद असतो. अर्धा किलो एक किलोच घ्यायला पाहिजे असं काही नाही. एकच कुर्जेट, दोनच ढोबळी, एकच सफरचंद असं घेतलं तरी किंमत बदलत नाही. बाकी वातावरण एकदम घरगुती असतं. बहुतेक शेतकऱ्यांचे नेहमीचे ठरलेले ग्राहक असतात. आम्ही परवा अशाच एका अडबाजूच्या गावातल्या शेतकरी बाजारात गेलो होतो.त्या भागात फारसे परदेशी लोक जात नसावेत हे आमच्याकडे वळणाऱ्या कुतूहलाच्या नजरा सांगत होत्या. 

बाजार सुरू होतो तिथं मास्कच्या सूचना होत्या. समोरासमोर उभ्या असलेल्या दोन रांगा एवढाच बाजार. स्वच्छ, शिस्तबद्ध. सुरुवातीलाच नव्या बटाट्याच्या पुष्कळ गाड्या होत्या. बहुतेक लोक दहा दहा किलोच्या गोण्या घेत होते. त्यातही तळायचे बटाटे वेगळे,भाजायचे वेगळे आणि प्युरी करायचे वेगळे. कांदे आणि रताळी भरलेली पाच पाच किलोची छोटी पोती भराभर संपत होती. चीज चे ट्रक अक्षरशः रिकामे होत होते. आता येणाऱ्या कडक हिवाळ्याची तयारी. सध्या सफरचंद आणि पेअरचा हंगाम आहे. अतिशय स्वस्त दरात ताजी फळं मिळत होती. 

या ऋतूत इथे लोक खूप भोपळे खातात. भोपळ्याची सजावटही करतात. अमेरिकेत करतात तसं कोरून आतमध्ये लाईट किंवा दिवा लावून ठेवण्याचीही पद्धत नव्याने सुरू झाली आहे. पण सगळ्यांच्या अंगणात नुसते भोपळे सजावट म्हणून ढीग करून एकावर एक रचून ठेवलेले दिसतात. अर्थातच सजावटीसाठी वेगळ्या प्रकारचे भोपळे असतात. ते सगळे खाण्यायोग्य नसतात. एका शेतकऱ्याकडे असेच खूप प्रकारचे भोपळे होते. त्याच्याकडून थोडे खायचे भोपळे घेतले. आणि फोटो काढू का विचारलं. तो आनंदाने हो म्हणाला. 

त्या सगळ्या प्रकारात मला सांगडीचे भोपळे दिसले आणि एवढा आनंद झाला! 

माहेरी गोदावरीच्या काठावर पोचले! गंगेकाठचं गाव म्हणून प्रत्येकाला पोहता आलंच पाहिजे हा नियम! थर्माकोल,रबरी टायर, फ्लोट्स येण्याच्या आधी भोपळा पाठीवर बांधून पोहायला शिकायची पद्धत होती. आतून पूर्ण पोकळ असलेले भोपळे पक्क्या दोरीमध्ये गुंफून त्याची सांगड तयार करायची. ती सांगड एकदा पाठीवर बांधली की बुडायची भीतीच नाही! पोहून आलं की सांगड दोरी वाळेपर्यंत नीट लटकून ठेवायची. 

हेच भोपळे समजा फुटले तर फेकायचे नाही. त्रिपुरारी पौर्णिमेला त्या तुकड्यांवर दिवे लावून गंगेत सोडायचे. दूरवर तरंगत जाणारे हजारो दिवे,कुडकुडायला लावणारी थंडी आणि गंगेचं पहाटे उबदार असणारं पाणी या मनावर कोरलेल्या गोष्टी आहेत! 

हे सगळं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात लहानशा खेडेगावात त्या भोपळ्याच्या ढिगासमोर आठवत होतं. त्या शेतकऱ्याला कुतूहल वाटलं. त्याने तुझ्या देशात पण असे भोपळे असतात का असं विचारलं. मला काही सांगड म्हणजे काय हे त्याला डचमध्ये सांगता येईना. इंग्रजी त्याला कळेना. शेवटी मी चक्क मराठी आणि डच मिसळून हातवारे करून सांगितलं ! ते मात्र समजलं !!! त्याच्या चेहऱ्यावर  एवढं आश्चर्य होतं ! त्याने लगेच शेजारच्या म्हाताऱ्या शेतकऱ्याला हे सांगितलं. त्यानेही भोपळ्याचा असा उपयोग कधी पाहिला नव्हता असं म्हणून दाद दिली ! आता हा भोपळेवाला सांगड करणारे म्हणे !!! 

संवादाची इच्छा असेल तर भाषा ही अडचण कधीच नसते हे पुन्हा सिद्ध झालं!






Monday, 10 August 2020

व्हिएतनाम

विमान उतरताना खाली बघितलं तर तिथं काचा विखुरल्यासारखी तळी,सरोवरं,नद्या,झरे चमचम करताना दिसतात !
लांबच लांब कुरणांसारखी दिसणारी भातशेती, नागासारखे सळसळत वळणं घेत जाणारे काळेशार रस्ते, लाल करड्या मातीने माखलेली कौलारू घरं, आणि चिरतरुण दिसणारे आनंदी चेहऱ्याचे लोक !! ही पहिली फ्रेम मनात साठते!
हॉटेलांमध्ये उत्तम अमेरिकन इंग्रजी बोलणारा स्टाफ असतो. आणि तो लहानसहान गोष्टींना वाकून वाकून सॉरी आणि thank you म्हणत असतो. बुकिंग करताना फोटोत दिसलं त्यापेक्षा खूपच चिमुकलं हॉटेल असतं हे. त्याची जाणीव स्टाफला असल्याने कमळाचा चहा, खास कॉफी, कमळाच्या बियांची मिठाई असे फ्री लाड होत राहतात! 
उशीरच झालेल्या जेवणाची सोय म्हणून शेजारच्या दुकानात जाता. दुकान बघून तुम्हाला तुमच्या खेड्यातल्या बस स्टँड वर असलेलं दुकान आठवतं. तिथे पुणेरी दुकानदारांची मावशी टीव्ही वर चालू असलेली त्यांच्या भाषेत डब केलेली भारतीय सासबहू मालिका बघण्यात तल्लीन झालेली दिसते. समोर खरेखुरे अडीच भारतीय आहेत आणि त्यांना काहीतरी विकत घ्यायचं आहे या किरकोळ गोष्टींशी तिचा काही संबंध नसतो.
तुम्ही शाकाहारी आहात म्हणल्यावर गावभर शोधून एका हॉटेलमध्ये शाकाहारी मिळेल म्हणून जाऊन बसता. आणि समोर येतो चिकट भात आणि उकडलेली मॉर्निंग ग्लोरी ! झेन चेहरा ठेवून तुम्ही ते तोंडात घालता आणि बुद्ध हसतो !!!! अप्रतिम चव !  तिळाच्या तेलाची आणि लसणाची चव फक्त ओळखू येते. पण जे काही असतं ते फार छान असतं!!!
शहरातल्या ठराविक फारशा छाप न पाडणाऱ्या चार गोष्टी बघून दिवस संपतो.
मग तुम्ही पायऱ्यांची भातशेती असलेल्या अति उंच डोंगरावर शेतकरी कुटुंबात रहायला जाता. कुटुंबप्रमुख स्वतः गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला आलेला असतो. जाताना उत्तम इंग्रजी बोलणारा चालक मालक शेतकरी "आमच्याकडे आम्ही मज्जा म्हणून निवडणुका घेतो " असं सांगून देशाच्या राजकारणाच्या रंजक गोष्टी सांगतो. मग या देशाचा इतिहास, रानटी टोळ्या, त्यांचे कबिले, सांस्कृतिक गोष्टी यांची देवाणघेवाण होते! सुमारे 8 तासांचा प्रवास असतो हा! तो गाणी लावत नाही,तो अंदाज घेऊन प्रश्न विचारतो,प्रश्न विचारले तर भरभरून माहिती देतो!
मैलोनमैल रस्त्यावर टोलनाक्यावर एकच स्त्री टोल गोळा करत असते. कोणत्याही सिक्युरिटी गार्डशिवाय!
मध्येच काहीतरी होतं आणि पोलीस गाडी अडवतात. मालक सराईतपणे बाजूला नेऊन त्यांना पाकिटातून खाऊ देऊन येतो. लाच देणं हे दैनंदिन आयुष्याचा भाग आहे म्हणतो!
या आमच्या होस्ट चे वय काय असेल याचा आम्ही अंदाजच बांधत राहतो. अंदाजे 25.
वाटेत धाब्यावर सँडविच आणि केक मिळतो. चालक महाशय फक्त उकडलेली बारीक बारीक अंडी खातात. शेंगा फोडून खाल्ल्यासारखी!
पाच सहा तास फक्त उंच उंच जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला मुन्नार आठवते! आल्प्स च्या रांगा आठवतात. सांगला चितकुल रस्ता आठवतो! पण हे अजूनच वेगळं असतं.
वाटेत एका वळणावर चालक खिशातून दोनतीन नोटा काढून वाऱ्यावर उधळून देतो! त्या ठिकाणी अपघातात गेलेल्या कुणा नातेवाईक आत्म्यासाठी हे करावं लागतं असं सांगतो.
घरी गेल्यावर जीव वेडावून टाकणाऱ्या हिरव्यागार  डोंगराळ शेतात सुबक झोपडी रहायला मिळते. मालकीण बाई रांगत्या लेकीला घेऊन स्वागताला येते आणि मालक सलग 12 तास अशी अवघड रस्त्यावर गाडी चालवूनही गावची फुटबॉल मॅच म्हणून टीम मध्ये खेळायला जातो!
रात्री जेवायला उकडलेल्या भाज्या,टोफू,फळं, भात ,फो नावाचं सूप, उकडलेली कणसं,असा टेबल भरून मेनू असतो तो तृप्त करतो!!! मग येतो सफरचंद दालचिनी चहा !!
दुसऱ्या दिवशी शेतात म्हशी रेडे काम करताना दिसतात. मालकीण बाई जातीने उत्तम न्याहारी घेऊन येते. दही दूध लोणी यांचा जाणवेल असा अभाव बघून तुम्ही चौकशी करता तेव्हा गायी म्हशी वासरं दुधापेक्षा खायला जास्त चांगली असं ज्ञान मिळतं!!!
पाणी कुठलं पिता याचं उत्तर 'झऱ्याचं' असं ऐकून आम्ही चकित होतो! नाश्त्याला ब्रेड बटर कॉफी ज्यूस !
हे तीन भाऊ एकत्र शेती आणि होमस्टे सांभाळतात. बायका मुलं शेतात मिळून काम करतात. त्यात ही जोडी मोठी. आणि या वाडीवर इंग्रजी बोलता येणारे हे दोघेच आहेत एवढी माहिती कळते.
 त्यातलाच एक आजूबाजूच्या गावात फिरायला नेणार असतो. आपण विचारतो, खरंच तुम्ही साप खाता?? यावर मराठी माणसाला भेंडीची भाजी खाता का विचारल्यावर येईल ती प्रतिक्रिया येते !!! खरंच रस्त्याच्या कडेला काठीवर आणि टोपलीत साप विकायला असतात!!!
सगळीकडे तीव्र उतरांच्या पण अतिशय सुबक आखलेल्या भात खाचरांच्या रेषा असतात. कॅलिग्राफी केल्यासारख्या त्या ओळी चक्क वाचाव्या वाटतात. पर्यटकांचे घोळके गटागटाने छत्री,काठी घेऊन लहानमोठ्या पायवाटा तुडवत असतात. पाऊस येतजात असतो त्याला कोणीही फार मनावर घेत नाही.
शेतात लावणीचा हंगाम असल्याने इरलीटाईप टोप्या घालून शेतकरी कामात मग्न दिसतात. वाटांवर कडेला बांबूची लहान मोठी बेटं आहेत. पिवळे पोपटी हिरवे बांबू !!
अनेक वळणांवर उकडलेली मक्याची कणसं आणि काळी कॉफी विकणाऱ्या बायका आहेत. टपरीवजा दुकानं आहेत त्यात पापड,चिप्स, कोकाकोला, बिस्किटे इ किरकोळ वस्तू आहेत!
ती शाळा,ते ग्रामपंचायत कार्यालय,तो दवाखाना अशा सारख्या दिसणाऱ्या दोन मजली कौलारू इमारती आहेत. बैठी कौलारू घरं आतून अतिशय प्रशस्त आणि सम्पूर्ण लाकडी जमीन केलेली दिसत आहेत. गळ्यात हातात नाकात कानात मण्यांचे दागिने घातलेल्या बायका पोरी टोप्या, कीचेन्स, बासऱ्या, पंखे विकत फिरत आहेत.
हवेला करकरीत स्वच्छ ताजा वास आहे!
गाडीभर दालचिनीचा वास दरवळत असतो तेव्हा कळतं की फ्रेशनर म्हणून दालचिनीच ठेवली आहे !!! हे तुम्ही घरी जाऊन करणार असता!
लोकल मार्केट म्हणजे भलं मोठं गोडाऊन आणि त्यात थेट बिडकीनच्या बाजारात शोभतील अशी दुकानं! त्यात तऱ्हेतऱ्हेच्या लाकडी,चामडी, धातू च्या वस्तू, मसाले,सुकी फळं, मासे, भाज्या, फळं, मांस ,प्राणी ,टोप्या,टोपल्या,जडीबुटी, चपला,कपडे, छत्र्या,पंखे,मिठाई,दागिने असं सबकुछ !!!!
रात्री मालक त्यांच्या कुटुंबासोबत जेवायला बसा म्हणतात. भलं मोठं लाकडी टेबल त्याभोवती 5-6 लेकरं, तीनचार बायका,तीनचार पुरुष. टेबलवर उकडलेली कणसं, मांस,कच्च्या मिर्चीची प्लेट, भात खायला छोट्या वाट्या आणि चमचे नाहीतच नुसत्या काड्या !!!
आमचं शाकाहारी टेबल शेजारी मांडलेलं त्यावर घट्ट सूप,भात,टोफू,बांबूची भाजी,गोड तिळाची खीर आणि हे खायला काड्या !!!
एवढं मोठं कुटुंब अखंड बडबडत मधूनच आम्हाला काहीबाही अनुवाद करून सांगत जेवत होतं. या अनुभवाने पोट भरलं!
तीनचार दिवस असं सगळं बघत साठवत परतीचा दिवस उगवतो. मालकीणबाई म्हणतात अजून दोन दिवस राहिला असता तर मिलिटरी शाळेत शिकणाऱ्या मोठ्या लेकराची भेट झाली असती !!! या दोघांच्या वयाबद्दलचा अंदाज सटकून चुकलेला आहे तर !!!
आता शहराच्या जवळच्याच एका रिसॉर्ट मध्ये आम्ही राहणार म्हणल्यावर मालक तिकडे किती भाडं आहे असं विचारतो. त्यावर त्याला रक्कम सांगताना आपण इकडच्या लवासा मध्ये रहायला जातोय याची बोचरी जाणीव होते!
ट्रिप संपवून परत निघताना विमानतळ रस्त्यावर पुन्हा शेतं आणि पाण्याच्या काचा बघून शेवटी तेच ठळक लक्षात राहणार आहे हे नक्की होतं!
आज हे सगळं 5 वर्षांनी आठवताना खूप मिश्र भावना मनात आहेत.जगातल्या एवढ्या गोष्टी एकाच आयुष्यात बघायला मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. सगळे फोटो पुन्हा पुन्हा बघितले आणि सुस्कारा सोडला!
ओह्ह व्हिएतनाम !!!!!

















Thursday, 7 October 2010

बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम

एका डच मैत्रिणीने सुचवले नि आम्ही निघालो बोकरैक गावाला. घरापासून रेल्वेने दोन अडीच तासांवर हे एक खुले संग्रहालय आहे आणि खेड्याशी संबंधित आहे एवढीच माहिती होती. सोबत ३५ वर्षे शिक्षिका म्हणून काम करून निवृत्त झालेली आणि बेल्जियमच्या इतिहासात आकंठ बुडालेली टीना असल्यावर त्या स्थळाची वेबसाईट उघडून बघण्याचीही गरज वाटली नव्हती. रेल्वेत बसल्याबसल्या तिने या ठिकाणची माहिती सांगायला सुरवात केली.
इ.स. १२५२ मध्ये एका फ्रेंच सरदाराने ही जंगल असलेली जमीन एका डच सरदाराला विकली. त्याने तिथे शेती सुरू केली. चौदाव्या शतकात त्या सरदार घराण्याने ती जमीन आपल्या शेतमजुरांना भाड्याने दिली. मजुरांनी तिथे घरे बांधली. एक छोटेसे गावच वसवले. नंतर जमिनीचे मालक बदलत गेले पण वस्ती मात्र शेतकर्‍यांचीच राहिली. शेतकर्‍यांची सहकारी संघटना गावचा कारभार पाहू लागली. मग गावच विकत घेतले. आणि शेवटी १९३८ मध्ये त्या शेतकर्‍यांनी आपले गाव लिम्बर्ग या वतनात स्वतःला सामिल करून घेतले. तेव्हापासून हे गाव अधिकृतपणे बेल्जियमचा भाग झाले.

gaon

दुसर्‍या महायुद्धानंतर या खेड्याची अवस्था फारच बिकट झाली होती. तेव्हा लिम्बर्ग संस्थानाने या खेड्याची ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्याची कल्पना अंमलात आणली. १२ व्या शतकापासून होत असलेले शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनमानातले बदल दाखवणारे स्थळ होते हे. २० वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी हे खेडे चौदाव्या शतकात होते तसे बांधण्यात आले. जुने अवशेष, जुने फर्निचर, शेतीची अवजारे, चित्रे, सैपाकाची भांडी सगळे काही जसे होते तसे ठेवले. घरे बांधण्यापासून शेतीच्या अवजारांपर्यंत कसे कसे बदल होत गेले ते इथे अनुभवायला मिळते.

मार्च ते सप्टेंबर या काळात तिथे नक्की जावे. त्या घरात त्या काळातली माणसंही भेटतात ! तसेच पोषाख, खाणेपिणे, पंचायत, प्रार्थना, नाचगाणी, खेळ सगळे सगळे जिवंत झालेले असते. अगदी कसलेल्या अभिनेत्यांसारखे ते लोक आपल्याच विश्वात राहात असतात. आपण जावे, त्यांना बघावे, प्रश्न विचारावे, गप्पा माराव्या, एखाद्याने दिला हातावर तर ब्रेड खावा आणि एखाद्या चित्रपटात वावरत असल्याचा अनुभव घेऊन आनंदी मनाने वापस यावे.
अचानक रेल्वे थांबली. एका गावाला आमच्या रेल्वेचा एक भाग निघून बोकरैकला जाणार होता नि एक भाग लिम्बर्गला. रेल्वे एक तास एकाच ठिकाणी उभी. काय झाले म्हणून चौकशी केल्यावर कळले की रेल्वेचे डबे एकमेकांपासून दूर जायला तयार नाहीत ! ये हुई ना बात ! आता खरे खेड्यात चालल्याचा फील यायला लागला ! शेवटी तिसर्‍याच एका गावात आम्हाला उतरवून पेशल झुकगाडीने आम्ही बोकरैकला पोहोचलो.

मोठ्ठे गेट ओलांडुन गेल्याबरोबर नकाशा बघितला. तीन भाग होते. एका भागात घरे, शाळा वगैरे; एका भागात बाजारपेठ आणि एक भाग पंचायत, एका भागात गोठे, तबेले, डुकरांचे गोठे वगैरे..

घरांकडे निघालो. घरांचे तीन प्रकार. एक म्हणजे आपल्याकडे असतो तसा वाडा. संरक्षक भिंती, फाटक, आत गेल्यावर एका बाजुला राहाते घर, दुसरीकडे गोठा,तबेला,खुराडे वगैरे आणि तिसरा भाग शेतीच्या अवजारांसाठी राखीव. श्रीमंत शेतकर्‍यांची घरं अशी असत. दुसर्‍या प्रकारात घराची रचना रेल्वेसारखी लांबच लांब असे. त्यातच तीन भागात माणसे, प्राणी आणि शेतीची अवजारे असत. झोपण्याची जागा प्राण्यांच्या जागेजवळ असे. प्राण्यांची ऊब असल्याने थंडी कमी वाटत असे. तिसर्‍या प्रकारची घरे मजुरांची आणि नोकरांची असत. साधे कुंपण, एक झोपण्याची आणि एक सैपाकाची खोली एवढेच घर.

ghar

बोलता बोलता एका घरात शिरलो. आधी तर शिंपलेले अंगण बघून मला भरुनच आले. फक्त त्या अंगणात एक तुळशीवृंदावन नि रांगोळी नव्हती. आत गेल्या गेल्या डाव्या हाताला आड. त्यात पोहरा सोडलेला. मग त्याला लागून यंत्रशाळा नि गोठा. अगदी बुटक्या दारातून राहात्या घरात गेलो. आपल्याकडील कोणत्याही खेड्यात बघायला मिळेल असे घर. तपशिलात थोडा फरक. भिंतीवर ख्रिस्ती संतांच्या तसबिरी, आढ्याला टांगलेले भोपळे, भिंतीवर एक बंदूक. एका बाजुला बसण्यासाठी टेबल खुर्ची. ( सोफा, दिवाण, पलंग, खाट वगैरे प्रकार नाही.) शेकोटीची जागा.

ghar

दुसरी खोली सैपाकघर. तिथे एक आजीबाई सैपाक करत होत्या. त्या काळातली हॉटप्लेट आणि ओवन सुद्धा ! फक्त हे सगळे कोळसा लाकूड यावर चालणारे. खमंग वास सुटला होता. आजीबाईंना विचारले "काय बेत आज?" म्हणाली, "लेकाने ससा आणलाय. तो तिथे शिजवून ठेवलाय. त्यासोबत त्याला कांद्याचे सॉस (कोणत्याही ग्रेवीला इथे सॉस म्हणतात ) बनवतेय." मग विचारलं काय काय घातलंय त्यात? तर म्हणे परसदारची रोजमेरी, चार मिरे नि भरपूर लोणी."

saipak

अजुन एक दार दिसले म्हणून आत गेलो तर ते कोठीघर होते. धान्य साठवण्याच्या कणगी, मोठमोठी पातेली, कढया आणि एक हातमाग. कोपर्‍यात एक चरखा सुद्धा होता.

charakha

पुढे अजुन एक दार दिसलं. आत एक छोटासा पलंग. त्यावर घोंगडी आणि गादी. खाली लाकडी बूट ठेवलेले. दोन जोड्या. एक लहान मुलाची असावी.

palang

जवळच एक लंबगोल आकाराची विणलेली टोपली. त्यात मऊ अंथरून पांघरूण. तान्ह्या बाळासाठी ! ही टोपली फार महत्त्वाची. बाई बाळंतीण झाली की बाळाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी बाळाला त्या टोपलीत घालून शेकोटीच्या जवळ ठेऊन देत असत. योग्य तेच अंतर असावे याबाबत सुईण फार दक्ष असे. शेकोटीच्या जास्त जवळ बाळाला ठेवले तर मोठेपणी ते फार तापट होणार आणि जास्त लांब ठेवले तर थंड स्वभावाचे होणार असा लोकांचा विश्वास होता. मला ती खोली बघताना माझा जन्म झालेली आजोळची बाळंतिणीची खोली आठवली !

bal

घराबाहेर पडताना आजीबाई काम आटोपून लोकरीचे विणकाम करीत बसल्या होत्या. या घराबाहेर पडून पुढे गेलो तर चर्च लागले. सगळे गावकरी पुरूष जमा झाले होते. फादर हातात बायबल घेऊन उभा होता. आणि सोबत गावचा पोलीसपाटील एक फर्मान वाचून दाखवत होता. म्हणे चर्चचे आवार फार घाण झाले आहे. गावातल्या 'पोरीबाळींनी' स्वच्छतेसाठी आपापल्या बादल्या-झाडू घेऊन शनिवारी सकाळी सात वाजता यायचे आहे. त्याचे सगळे भाषण काही मला समजले नाही. अजून एक विषय होता तो म्हणजे गावातली तरूण मंडळी बाहेरच्या कॉम्रेड्स च्या नादी लागतायत त्यांना समज देण्याबद्दल पालकांना धमकी होती !

मग शाळा लागली. ती ही आपल्या खेड्यातल्या प्राथमिक शाळेसारखी बांधलेली होती. मास्तरची रहाण्याची जागाही तीच असे. त्यामुळे ऑफीस मध्ये हीटर, टेबल-खुर्ची नि एक खाट. वर्गाच्या लहान लहान खोल्या. एका वेळी फार तर २० मुले मावतील एवढ्या. मागच्या भिंतीला कोट अडकवण्याची जागा. समोर शेकोटी, फळा आणि मास्तरचे डेस्क. भिंती धार्मिक चित्रे नि उपदेशांनी नटलेल्या. " तुम्ही जे काही करत आहात ते ईश्वर पाहात आहे " वगैरे सुविचार. एकूणच इथल्या जीवनावर चर्चचा जबरदस्त प्रभाव दिसून येत होता.

shala

बाजुला पंचायत भरण्याची जागा होती. एका मोठ्या वृक्षाखाली पार बांधलेला. तिथे गावातले पाच शहाणे लोक बसत आणि भांडणांचा न्यायनिवाडा करत. अगदी किरकोळ शिक्षा म्हणजे बाजारातल्या खांबाला गुन्हेगाराला बांधण्यात येई. त्याने केलेल्या गुन्ह्याची दंवंडी पिटली जाई. मग दिवसभर गावकरी त्याला येताजाता अंडी टोमॅटो फेकून मारत. गंभीर गुन्ह्यासाठी सुळावर चढविण्यात येत असे.

shiksha

दुसर्‍या प्रकारचे घर लागले. तिथे आत एक काका एकटेच पेपर वाचत बसले होते. त्यांना विचारले 'जेवण झाले का ?' तर म्हणे 'बायको गावाला गेलीय ना.. आता सैपाकपाणी काय पुरुषाचं थोडीच कामंय ! शेजारणीने बोलावलंय. जाईन थोड्या वेळाने' म्हणे "तुम्ही कॉम्रेड आहात का ? आमच्या पोरांच्या डोक्यात काहीही खुळ भरवू नका. त्याचे परिणाम वाईट होतील".

kaka

त्याच्या शेजारच्या घरात ज्या काकू सैपाक करत होत्या त्यांनीही सांगितले की "शेजारभाऊ जेवायला येणारंय.. "

kaku

इथेही खंमंग वास सुटला होता. भाजलेले चिकन, अंडी, टोमॅटो आणि कांदा घातलेला बटाट्याचा रस्सा चुलीवर रटरट शिजत होता. टेबलावर ताजा ब्रेड ठेवलेला होता.

saipak

या काकुंची परसबाग फार छान होती.पानकोबी, लाल भोपळे, शेंगा, वांगी लागलेली होती. रोजमेरी, कोथिंबिरीसारखी सेलरी घमघमत होती. काटेकोरांटी, रान गुलाब, झेंडू, शेवंत, अशी ओळखीची फुले दिसत होती. मन खुष झालं एकदम.

bag

पण स्वादिष्ट अन्नाच्या वासाने पोटातली भूक जाणवायला लागली. त्या पेपरवाल्या काकांना विचारले इथे रेस्टॉरंट कुठे आहे तर हे काय नवीन असा चेहरा केला त्यांनी. या प्रश्नाचे उत्तर देईपर्यंत तरी त्यांनी वर्तमानात यावे म्हणून प्रयत्न केला पण नाहीच ! शेवटी इथून जुन्या शहराकडे रस्ता जातो तिथे बाजार आहे असे कळाले आणि आम्ही तिकडे मोर्चा वळवला.
खरोखर बाजार फुलला होता. ताजी फळे, भाज्या, ब्रेड, बिस्किटे, मध, चीज, वाईन आणि मांस अशी दुकाने लागली होती. एका कोपर्‍यात रोपवाटिका होती. तिथून पर्यटक हौसेने सफरचंद, ऑलिव अशी रोपं घेत होती. आम्ही मग गरम गरम सूप, ताजे अक्रोड आणि जिंजरब्रेड घेतला नि जवळच एका जागी बसून यज्ञकर्म उरकले. रिमझिम पावसामुळे वातावरण गार झाले होते. आता सगुणाही कंटाळली होती. टीनाआज्जीलाही थोडी विश्रांती हवी होती. मग काय समोर एक टांगा आला त्यात बसलो नि मस्त खबडक खबडक करीत आजुबाजूचा निसर्ग न्याहाळू लागलो.

gaon

सफरचंदाची झाडे फळांनी वाकलेली होती. कुरणांमधून गलेलठ्ठ मेंढ्या चरत होत्या. घोड्यांनाही चरायला मोठमोठाली कुरणे ठेवली होती. त्या काळच्या मनोरंजनाची साधने म्हणजे विविध खेळ. आपण विटी दांडू खेळतो न तसा एक खेळ होता, तिरंदाजी, भालाफेक, उंच उड्या , दोरीवरचा मल्लखांब हे ठळक ओळखू आलेले खेळ. एक नृत्यगृह पण दिसले. थोड्या वेळाने खाली उतरून चालायला सुरुवात केली.

या भागातले सर्वात जुने घर बघायला गेलो. ते बंद ठेवले आहे. गवताचे छप्पर असलेले, कुडाच्या भिंती असलेले हे घर एका संताचे होते म्हणे.

sant

इथे एक विशेष गोष्ट समजली. त्या काळी काच नव्हती. त्यामुळे घरात उजेड तर आला पाहिजे पण हवा नको यासाठी डुकराच्या मुत्रपिंडाची त्वचा खिडकीला लावून ती बंद करत. त्या घराबाहेर एका ठिकाणी पालथ्या केलेल्या डालींसारखे काहीतरी दिसले. टीनाने सांगितले ते मधमाश्यांसाठी तयार केलेले घर !

madhmashi

मग जुनी पाणचक्की, बेकरी बघितली.

panchakki

हस्तकला उद्योग बघितले. गवताची खेळणी, चामड्याचे पट्टे, टोप्या वगैरे प्रकार, लाकडी वस्तू बनवण्याचे लहान कारखाने होते.

gavat vastu

gavat vastu

बर्‍याच गोष्टी बघताना नवीन काही दिसत नव्हते. थंडी चांगलीच वाढली होती. टीना नि सगुणा ( वय ६४ नि अडीच ! ) भरपूर थकलेल्या दिसत होत्या. मग त्यांना फार न ताणता परतीच्या वाटेवर लागलो. जाताना चुकीच्या दिशेचे वेळापत्रक बघण्याचा शहाणपणा हातून झाला होता. त्यामुळे ट्रेन चुकली. मग पुढच्या ट्रेन ची वाट बघत टीनाला 'गाण्याच्या भेंड्या' शिकविल्या ! ती डच गाणी म्हणायची नि आम्ही हिंदी मराठी. दिवसभर मोकळ्या वार्‍यात, थंडीत फिरल्यामुळे ट्रेन मध्ये बसल्याबसल्या डोळे लागत होते. दिवस कसा भुर्र्कन उडून गेला होता.

राहून राहून सारखं मनात येत होतं, बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी !

Monday, 13 September 2010

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम

सकाळ पावसात उजाडली. आजच्या प्रवासाला ' मजल दरमजल ' हे एकच नाव शोभले असते. भुरभुर पावसात बर्गन ला टाटा केले नि रेल्वेने जाऊन पोहोचलो वॉस ला. दोन बाकडे नि एक कॅफे असलेले नि एक कॅफे असलेले हे स्टेशन. एका बाजूला तळे नि तळ्याशी लगट करत रांगणारा रस्ता मग उगाच खोडकरपणे वर डोकं काढणारी एक टेकडी नि त्यावर उतारावर सरळ उभे रहाताना होणारी त्रेधातिरपिट दिसू न देण्याचा प्रयत्न करत असलेली घरे ! आणि आमचे सोबती.. रेल्वेचे रूळ ! एक मस्त झोका घेत वळणावर नाहीसे होत जाणारे... ! अवघ्या पाऊण तासात अजून काय काय बघायचं माणसानं !

VOSS

VOSS

आता पुढचा टप्पा बसचा. हे पण डायवर मामा आज खुषीत दिसत होते. बस चटकन भरली नि निघालीसुद्धा. आता जायचंय गुडवांगनला. एक प्रवासी गट वाटेत एका रिसॉर्टला उतरणार होता. ते रिसॉर्ट आले नि तिथे उतरणार्‍या, राहाणार्‍या लोकांबद्दल अगदी तीव्र असूया मनात दाटून आली. हे ठिकाण आपल्याला का नाही सुचले म्हणून स्वत:वर चिडचिडही झाली. ती जागाच तशी होती. एका डोंगराच्या अगदी कड्यावर ते हॉटेल बांधलेले होते. चहू बाजूंनी डोंगररांगा, समोर खोलच खोल दरी, आणि यावर कडी म्हणून त्या दरीत कोसळणारा प्रचंड धबधबा !

dhabdhaba

तेवढ्यात आमच्या चालकरावांनी सांगितलं की म्हणे क्यामेरे तयार ठेवा. पण सीटबेल्ट बांधून जागेवरच बसून रहा. फोटो काढण्यासाठी उभे वगैरे राहू नका. नियम पाळण्याच्या बाबतीत आपण एकदम भारी. तस्सेच केले. बस थोड्या कच्च्या वाटणार्‍या रस्त्यावरून पक्क्या पण अगदी अरुंद रस्त्यावर आली. सगुणाचं एक खेळणं आहे. नागमोडी घसरगुंडी. त्याच्या डो़क्यावरून आपण कार किंवा बस सोडायची..दोन सेकंदात सुळ्कन खाली घसरत येते. हा रस्ता तस्सा होता ! आता आमची बस पण तशीच सुळ्कन खाली गेली नाही म्हणजे बरे ! आपल्या कर्नाटकातले ऊटी, कोडाई वगैरे रस्ते आधी अनुभवले होते म्हणून बरं. नाहीतर रामरक्षा कधीच सुरु झाली असती !

valan

हेअरपिन का काय म्हणतात तशा वळणावरून बस तुरुतुरू चालली होती. शेजारी धबधबा दिसत होता. फोटो काढण्यासाठी कुणी हौशी उठला की चक्रधारी ( हो, आता या क्षणाला ते सारथी, चक्रधारी सगळे होते!) समोरच्या आरशातून एक मिश्किल कटाक्ष टाकायचे. आणि बहुतेक आरशातून आपल्याकडे बघण्याच्या नादात सर्वांना एकत्र मोक्ष मिळू नये या भितीनेच हौशी खाली बसायचा. दुसरे वळण आले की पुन्हा फोटोंची घाई व्हायची. चालकराव कथा सांगू लागले. हा पक्का रस्ता बनायच्या आधी म्हणे हिवाळ्यात बर्फ पडलेले असतानाही जिवाची बाजी लावून बस चालवावी लागायची. समोर दरीत एक छोटीशी वस्ती दिसत होती. आणि काही शेतंही !

dari

आम्हाला त्या तिथे पोहोचायचे होते. अगदी काळजीपूर्वक सावकाश चालत बस पोहोचली. समोरचे दृश्य जादूई होते. उंच डोंगराच्या माथ्यावर ते आम्ही पाहिलेले रिसॉर्ट मुठीएवढे दिसत होते. आम्ही जिथे उतरलो तिथे केवळ एक बोटीचा धक्का होता. आणि एक पूल. सरोवराचा सर्वात चिंचोळा भाग हा. इथे मोठी जहाजे येऊच शकत नव्हती. एका छोट्या फेरीने आम्ही पुढ्चे साडेतीन चार तास प्रवास करून फ्लाम गावी पोहोचणार होतो.

gudvangan

हा प्रवास मला सर्वात जास्त आवडला. छोट्याश्या बोटीवर शंभर माणसं असतील. दोन्ही बजूला उत्तुंग पहाड आणि त्यावरची खेडी. मन वारंवार त्या भागात चिकाटीनं नि जिद्दीनं राहाणार्‍या लोकांना प्रणाम करत होतं. नॉर्वे सरकारला सलाम करत होतं. या गावांच्या अगदी जवळून आम्ही जात होतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या पाकळ्या समोर दिसत होत्या. एक त्यातल्यात्यात मोठं गाव लागलं. तिथे म्हणे आजुबाजूच्या वस्त्यांवर राहाणार्‍या मुलांसाठी १०० वर्षांपूर्वी शाळा सुरू झाली. एक गाव फक्त मृत लोकांचे ! म्हणजे आजूबाजूच्या गावातून अंत्यविधीसाठी तिथे जायचे. मध्येच एक सोनेरी पाकळी दिसली. अवघी ५ घरं असणार्‍या एका गावच्या (?) धक्क्याला आमची फेरीबोट उभी राहिली. खाली सायकलरिक्षासारख्या एका गाडीत पोस्टमन काका उभे होते. फेरीवरून एक पार्सल खाली फेकलं गेलं नि त्यांनी ते झेललं. हे सगळं समोरच्या घरातली सत्तरीच्या घरातली आजीबाई बघत होती. पोस्टमन काकांनी तिला तिथनच हात उंचावून बहुतेक पत्र दाखवले. म्हातारी अक्षरशः दिव्यासारखी हसली! तिने आत जाऊन एक चिमुकला रुमाल आणला नि आमच्या फेरीकडे बघत फडफडवला ! वाट बघणं आणि ती फळाला येणं एवढं सुंदर 'दिसू' शकतं ? तिचा आनंद त्या रुमालाने आमच्यापर्यंत किती सहज पोहोचवला..

post

इकडे फेरीमध्ये वेगळीच गंमत घडत होती. कॅफेमध्ये एकाने (बहुदा मालकाने), आम्हाला भारतातून आलात का असे विचारले. म्हट्लं हो. मग म्हणे कुठून. म्हटलं मुंबईजवळून. म्हणे पुणं माहीतय का ? आँ.. हो असे म्हटल्यावर म्हणे वाई माहितंय ?? थक्क झालो आम्ही. हा बाबा कधीकाळी वाईमध्ये गरवारे मध्ये काम करत होता म्हणे ! त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने आम्हाला उकळलेला चहा दिला !
त्याला विचारले की फ्लाम चे रेल्वे स्टेशन बोटीच्या धक्क्यापासून किती दूर आहे ? त्यावर काय बावळट लोक आहेत असा चेहरा करून तो म्हणाला," अरे बाबांनो तुम्ही फ्लाम ला जाताय न्युयार्कला चालल्यासारखं काय विचारताय ? फ्लाम हे गाव मुळी काही मीटर्स मध्ये मोजतात! "
फ्लाम आलं. एक अजस्त्र बोट तिथे उभी होती. त्यापेक्षा प्रत्यक्ष गाव कितीतरी लहान होतं. इथे तास दीड तास वेळ होता. सगळीकडे हिरवाई, स्वच्छ प्रकाश आणि निर्मळ पाणी दिसत होते.

flam

flam

आता पुढचा टप्पा रेल्वेचा. जगातल्या सर्वात सुंदर रेल्वेपैकी एका रेल्वेची आम्ही वाट बघत होतो. ही रेल्वे म्हण्जे नॉर्वेच्या इतिहासातलं एक अत्यंत कौशल्याचं आणि धाडसाचं पान. समुद्रसपाटीपासून २ मीटर वरून ही रेल्वे तासाभरात ८६६ मीटर वर असणार्‍या मिरडाल या गावी नेते. २० कि.मी. चा हा रेल्वेमार्ग बांधायला २० वर्षे कष्ट घ्यावे लागले. १९२० साली सुरू झालेले हे काम १९४० ला पूर्णत्वास गेले. १९४४ साली तेथे पहिली विजेवर चालणारी रेल्वे सुरू झाली तर १९४७ साली वाफेवरील इंजिनाची शेवटची रेल्वे धावली. २० लांबलचक बोगद्यांपैकी १८ बोगदे हे मजुरांनी हातांनी खणले. हे बोगदे सहा सहा कि. मीटर्स लांबीचे आहेत ! पैकी एक बोगदा डोंगरातच १८० अंशाच्या कोनात वळतो ! किती साहस नि किती कौशल्य पणाला लागले असेल हे बांधताना. या मार्गावरून जाताना "रारंगढांग" मनात येत होतं.

flambana

या मार्गावर नॉर्वेमध्ये इतरत्र न दिसणारी दुर्मिळ निसर्गदृष्य बघायला मिळतात. या जंगली, भीषण आणि तितक्याच तजेलदार निसर्गाभोवती इथे उगाच गूढतेचे वलय असल्याचे भासते. कदाचित "मिस्टेरियस" हा शब्द वारंवार गाईडच्या तोंडी येत होता म्हणून असेल असे वाटले. आणि या फ्लामबानारेल्वेने अजून एक अविस्मरणीय अनुभव दिला.
एका प्रचंड धबधब्यासमोर रेल्वे थांबली. सगळे प्रवासी फोटो काढायला खाली उतरले. ही लगबग चालू असताना संपूर्ण आसमंत कसल्याश्या गोड संगीताने भारून गेला. समोर धबधब्याची गाज, गर्दी असूनही संगीत वातावरणात भिनले. धबधब्याच्या मध्येच एका कातळावर कुठूनशी एक रक्तवर्णी वस्त्र ल्यायलेली एक सुंदरी प्रकट झाली ! त्या संगीतातले शब्द कळत नव्हते पण सुरांची भाषा मात्र खूपच जवळची.. ती निश्चितच एखादी विराणी गात होती. मध्येच गायब व्हायची नि खूप अंतरावरच्या एका दुसर्‍या कातळावर दिसायची. शुभ्र पाण्याच्या पार्श्वभूमीवर ही केवळ आकृती दिसत होती. तिचे नृत्य तिची विरहगाथा सांगत होते. काही काळ काळाची पावलं तिला बघण्यासाठी, तिची व्यथा ऐकण्यासाठी जणू स्तब्ध झाली होती. कधीकाळच्या आणाभाकांना साक्षीदार असेल ते पाणी. आज मात्र त्या विरहिणीच्या व्यथेतले पाणी त्या उदंड पाण्यापेक्षा जास्त ठळकपणे दिसत होते.

dhabdhaba

baai

समाधी भंगली ती रेल्वेने बोलावल्यामुळे. पुढचा टप्पा लवकरच संपला. रेल्वेने आम्हाला मिरडाल ला सोडले. आता शेवटचा टप्पा होता मिरडाल ते ओस्लो. हा संपूर्ण प्रवास डोंगरावरच्या पठारावरून होता. वाटेत ठिकठिकाणी हायकिंग, ट्रेकिंग साठी येणारे गिर्यारोहक दिसत होते. एक तर सायकलपटुंचा गट दिसत होता. लांबवर ग्लेशियर्स आणि तिथे पोहोचण्यासाठी निघालेले; संध्याकाळ झाली म्हणून तंबू टाकून तळ ठोकलेले लोकही दिसत होते. ठिकठिकाणी हॉलिडे होम्स च्या पाट्या दिसत होत्या.

glaciers

एक अचानक लक्षात आलं; इथे आजूबाजूला पर्वतरांगा नव्हत्या. कारण आम्ही खुद्द त्या पर्वतांच्या डो़यावरून रेल्वेने प्रवास करत होतो !
रेल्वे आता खाली उतरू लागली. मन आणि शरीर दिवसभराच्या नव्या नव्या अनुभवांनी शिणले होते. किती प्रवास झाला आज ! सकाळी आठ ते रात्री साडेदहा आम्ही वाहानं बदलत बदलत प्रवासातच होतो. रेल्वे, मग बस, मग फेरी, मग पुन्हा रेल्वे नि शेवटी अजून एक रेल्वे ! दिवसभर जाणवले नाही पण आता हा विचार करतानाही दम लागत होता. बाहेर संधीप्रकाशात अजूनही निसर्ग नटलेला दिसत होता. पण आता या क्षणी जगातले काही सुंदर बघायचे राहिले आहे असे वाटत नव्हते.

matha

matha
ओस्लो ला साडेदहाला उतरलो. खायला शाकाहारी मध्ये केवळ कोरडे सॅंडविच मिळाले. खाऊन पुन्हा तासभर रेल्वेने जाऊन विमानतळावर पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे वेटिंग एरिया असणार असे गृहित धरले होते. पण तसे इथे काहीच नव्हते. नाही म्हणायला सहा बेंचेस सापडले. आमचे विमान सकाळी सहाला होते. आमच्यासारख्या लोकांनी आपली सोय शोधली होती. त्या आवारात असणार्‍या रात्री बंद झालेल्या कॅफे मधील कोचावर जाऊन बसलो. रात्र सरली. पाच वाजता चेक इन केले. आता मात्र विमानात गर्दी होती. विमान उडाले. उंचावरून दिसणारे नॉर्वे पुन्हा एकदा डोळ्यात भरून घेतले. स्मृतीत कोरून घेतले. डोंगराच्या कपारीत चार दिवसांसाठी मुक्कामाला राहिलेले पक्षी घरट्याकडे परत जाताना त्या पर्वतांना काय बरं वाटत असेल ?