Monday 23 March 2015

मानसिक आरोग्याची बाराखडी ४ आरशातलं झाड

मानसिक आरोग्याचे पायाभूत निकष बघितले तर स्वतःचा बिनशर्त स्वीकार ही पहिली आणि अतिशय महत्वाची पायरी आहे हे आपल्या लक्षात येईल.

स्वतःचा स्वीकार म्हणजे काय हे कळण्याआधी स्व-रूप-दर्शन होणे महत्वाचे ! यासाठी कार्यशाळांमधून एक अ‍ॅक्टिविटी फार उपयोगी ठरते. ती इथे सांगतेय. पायर्‍यांच्या स्वरूपात -

१) एक मोठा पांढरा स्वच्छ पेपर घ्या, त्यावर एक पानभरून झाड काढा.
२) त्या झाडाला मुळं,फांद्या,फुलं,कळ्या,फळं,पानं आणि काटे भरपूर काढा.
३) आता झाडाच्या पायाशी काही गळून गेलेली फळं काढा.
४) आता मुळांना नावं द्यायचीत आपल्या पूर्वजांची..गुरूजनांची...आपल्या आधीच्या पिढीतील ज्या ज्या लोकांचा माझ्यावर ठसा आहे अशा लोकांची. उदा: बाबा, आई, आजोबा, काका, आजी, मावशी, केके सर, डॉक्टर,.....
५) फांद्यांना नावे द्या तुमच्या पिढीतल्या तुम्हाला आधार वाटणार्‍या व्यक्तिंची. भावंडं, सहकारी, मित्र, पार्टनर इ.
६) पानं- पानांना नावं द्या ज्या ज्या लहान गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो अशा गोष्टींची.
उदा: सकाळचा गरम चहा, पुस्तक, गाणं, नाच, खेळ, गप्पा, चॅटिंग, व्यायाम, कपाट आवरणं, स्वच्छता, नवा पदार्थ करणं, मुलांसोबत खेळ, आपापले छंद, आध्यात्मिक वाचन, देवपूजा, आवडीच्या विषयात अभ्यास, खरेदी....
७) फळं - आठवतंय तसं आपल्याला लहानमोठी शाबासकी मिळालेली असते. छोटीमोठी बक्षिसं असतात. प्रत्येक फळाला एक लिहा. उदा: ४ थी त असताना गाण्यात नंबर आला होता, ६ वीत कबड्डीत जिंकलो तेव्हा ढाल , कॉलेजात अमुक बक्षिस, ऑफीस मध्ये कामाचं कौतुक, घरात तुम्ही केलेली आमटी पिल्लाने भुरके मारून चाटून पुसून खाल्ली ! कवितेला बक्षिस्/छापून येणं, अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या अचीवमेंट्स वाटतात त्या सर्व गोष्टी.
८) कळ्या - तुमची लहान मोठी स्वप्नं, इच्छा
९) फुलं - तुमची बलंस्थानं. यात शैक्षणिक सोबत इतरही गोष्टीपण येऊद्या. स्वभाव, इतर गुणविशेष
१०) काटे - तुमचे तुम्हाला आणि इतरांना टोचणारे गुण (!)
११) पडलेली फळे - काही गोष्टी करायच्या राहून जातात. त्या आता करणे शक्य नसते अशा गोष्टी.
उदा: खरं तर मला मेडिकल हवं होतं. आता आर्किटेक्ट म्हणून समाधानी आहे. पण मी तेव्हाच ती निवड का नाही केली ते सलतं कधी कधी.... किंवा परदेशात शिक्षणाची संधी होती ती नाकारली., काही चुकीचे ठरलेले निर्णय..
हे सगळं अगदी शांत बसून निवांत लिहा.
एकदा लिहून पूर्ण झालंय असं वाटत नसेल तर मन रिकामं होइस्तोवर लिहीत रहा.

आता या झाडाकडे प्रेमानं बघा.

ही मी आहे. ही माझी मुळं, यांनी मला पोषण दिलं, या फांद्या माझ्या - मला तोल सावरायला मदत करणार्‍या, ही पानं, मला ऊर्जा देणारी, ही फुलं- यांनी मला स्वतःला नि इतरांना आनंदी कसं ठेवायचं ते सांगितलं, या कळ्या- आज ही माझी स्वप्नं आहेत पण यांची फुलं होतील, आणि मग त्यांचीच फळं ! ही पानं फुलं कळ्या फळं माझीच ! काटेही माझे.

झाडाने जर कळ्या उमलवण्याचं स्वप्नं बघितलं नाही तर ते वठून जाईल. शुष्क होत एक दिवस मरून जाईल. ते तसं झालं तर मुळं उन्मळून पडतील, फांद्या तुटतील ! हे होऊ नये म्हणून मला काळजी घ्यायची आहे. आणि ती पडलेली फळं ! ती पुन्हा झाडाला जोडणे अशक्यच !त्या माझ्या मर्यादा ! त्यांचे दु़:ख मनात ठेवेन. पण त्याची झळ उमलू पाहणार्‍या कळ्यांना लागू देणार नाही. हे माझं झाड. जणू माझा आरसाच ! यातलं सगळं काही म्हणजे संपूर्ण मी आहे.

आपल्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करण्याची धडपड करणं म्हणजे भावनिक हित जपणं. माझं अस्तित्व टिकायचं असेल तर भावनिक हित जपायलाच पाहिजे. त्यासाठी 'स्वार्थी' लेबल लागलं तरी हरकत नाही. ज्यात इतरांचे कोणतेही नुकसान नाही व माझे हित आहे त्या गोष्टीकरणे स्वार्थीपणाचे कसे असेल !

माझ्यातल्या नकारात्मक भावनांचाही मी स्वीकार केला पाहिजे. इतरांच्या दृष्टीने आपण स्वार्थी अप्पलपोटे असलो तरी ती लेबल्स लेबल म्हणून लावून न घेता त्या परिस्थितीतल्या त्या भावनेचा निखळ स्वीकार करणं हे सशक्त मानसिकतेचं लक्षण. उदा: अमुक एका क्षणी मला मोह झाला. म्हणून मी स्वार्थी. या वाक्यातला दुसरा भाग आवश्यक नाही. मला मोह झाला ! बास !

अमुक प्रसंगात माझे वर्तन चुकीचे होते. माझ्या हातून चुका होऊ शकतात.
हा झाला "स्वीकार". आपण जेव्हा अशा नकारात्मक गोष्टींना लेबल लावतो नं तेव्हा ती होते "कबुली" ! कबुली बरोबर जन्माला येते अपराधी भावना, त्याबरोबर खंत ! आणि ही साखळी कुठे नेईल ते सांगता येत नाही.
म्हणून माझ्यातल्या नकारात्मक गोष्टींना कोणतेही चांगले किंवा वाईट लेबल न लावता त्याचा वस्तुनिष्ठ स्वीकार करणे महत्वाचे.

हे झाले की खूप छान छान गोष्टी होतात. एकतर आपण स्वतःकडून आदर्श वगेरे होण्याची अशक्य इच्छा करत नाही. कोणतीही चूक घडली तर लगेच न्यायाधीशाच्या भूमिकेत जात नाही. अनेक क्षुल्लक गोष्टींवरून स्वतःचे संपूर्ण मूल्यमापन करणं टाळता येतं. आपल्याला नेमकं काय हवंय हे कोणत्याही आडपडद्याशिवाय समोर निखळ दिसू लागतं आणि आपण स्वतःबाबत करतो तसा विचार आपल्याही नकळत इतरांबाबतही करायला लागतो.

याचा अर्थ आपण फक्त स्वतःचाच हिताचा विचार करतो असा आहे का ? नाही. कारण स्वहित जपताना मी इतरांच्या हिताच्या आड येणार नाही याचीही काळजी मी घेत असते. इथे आपण पूर्वी बघितलेला भावनांचा लंबक आठवा. त्यात आपण म्हटलं की दोन्ही टोकं वाईटच. मी त्या हिंदोळ्यांवर तोल सावरण्याचा प्रयत्न करत असते. केवळ दुसर्‍याचं हित जपण, चंदनासारखं झिजणं वगैरे ! आणि वाट्टेल ते करून आपलं हित साधणं ही दोन्ही टोकं नकोत. यातला विवेक आपल्याकडे हवा.

हे झालं आरशातल्या झाडाबद्दल ! आपल्याबद्दल ! वर सांगितलेली अ‍ॅक्टिविटी नक्की करून बघा. मला खात्री आहे, स्वतःला नव्याने सापडाल.
पुढच्या भागात दुसर्‍या झाडांविषयी Smile इतरांविषयी !

3 comments: