Friday 23 December 2022

नुच्चिनउंडे

 तर परवा काय झालं, आमच्या सोप्या अवघड रेसिपी या ग्रुपमध्ये एक काम अंगावर येऊन पडलं. त्या ग्रुपमध्ये सगळे सतत इतरांना कामाला लावत असतात.त्यात ऍडमिन ताई सगळ्यात पुढं ! त्यांनी आता निमित्त केलं स्वातंत्र्यदिनाचं! प्रत्येकाला भारतातलं एकेक राज्यच बहाल केलं आणि सांगितलं- "ऐश करा! या राज्यातला एक नवा आधी कधी न केलेला पदार्थ शिका आणि करा आणि खा आणि अर्थातच दाखवा!"

मग काय लागले सगळे कामाला.
मला आधी आलं पुद्दुचेरी. खूप शोधाशोध करून तिथले सापडले ते शाकाहारी पदार्थ तमिळच निघाले ! फ्रेंच पद्धतीचा तिथल्या खानपानावर खूप पगडा आहे पण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परकीय पदार्थ करायचं मनाला काही पटेना. मग राज्य बदलून मिळावं म्हणून अर्ज केला तर आलं कर्नाटक! ब्येष्ट !!!
इडली,दोशे,उत्तप्पा, वडे,अवियल, रसम,सांबार, तंबळी,उपमा,शिरा,आप्पे,मुद्दे,भाताचे प्रकार हे सगळं सगळं खूप आवडतं असल्याने शिकून नेहमीच करत असल्याने अजून नवं काहीतरी शिकायचं होतं. Geeta Muthya गीताताईने सांगितलेले मोश्शप्पू,काई गंजी,कूट असे बरेच पदार्थ शिकायच्या यादीत आहेत पण त्यातही एका पदार्थाने लक्ष वेधून घेतलं.
नुच्चिनउंडे !
आपल्या महाराष्ट्रात नागपंचमीला वाफवून उकडून केलेले पदार्थ खातात तसंच कर्नाटकातही नागपंचमीला नुच्चिनुंडे हा वाफवून खायचा पदार्थ करतात. नागपंचमी पण होतीच तर हेच करायचं ठरवलं.
पदार्थ सोपा आहे,पौष्टिक आहे, कमी वेळात होणारा आहे आणि चविष्ट आहे!
हेब्बारताईंनी व्हिडीओसह रेसिपी दाखवलेली आहेच तरीपण लिहिते.
साहित्य :
१वाटी तुरीची डाळ
१वाटी हरबरा डाळ
अर्धी वाटी खोवलेला नारळ
अर्धी वाटी बारीक चिरलेला शेपू ( हा आवडत नसल्यास नका घालू)
अर्धी वाटी कोथिंबीर
दोनचार मिरच्या बारीक चिरून
चमचाभर जिरे,थोडा हिंग
मीठ
कृती -
डाळी कमीतकमी 3 तास भिजवायच्या. मी रात्रभर भिजवल्या.
मग निथळून पाणी न घालता भरड वाटून घ्यायच्या.
त्यात नारळ,शेपू,कोथिंबीर, मिर्ची, जिरे,हिंग मीठ मिसळून गोल किंवा सिलिंडर वळून घ्यायचे. चाळणीत ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यायचे.
उंडे तयार.
हे उंडे वरून तूप घालून एखाद्या तिखट चटणीबरोबर खातात. मी आज टोमॅटोची तिखट चटणी आणि नारळ कोथिंबिरीची अशा दोन चटण्या केल्यात. हे फार कोरडं वाटत असेल तर तंबळी किंवा मज्जीगेहुळी सारखं पातळ काहीतरी सोबत छान लागतं.
न्याहारी म्हणून हा पदार्थ मला उत्कृष्ट वाटला. साईड डिश म्हणूनही उत्तम आहे.
आजची न्याहारी नुच्चिनउंडे, टोमॅटो चटणी,कोथिंबीर चटणी,तूप,आणि रवा केसरी !
येताय ना खायला?

२६ ऑगस्ट २०२१



स्वित्झर्लंडमधली ट्रेन

बर्नवरून झुरीकला चाललोय. ट्रेन 80% भरलेली आहे. समोरच्या सीटवर एक तरुण खेळाडू फोनवर मोठमोठ्या आवाजात इटालियन बोलतोय. शेजारी दोन काकू,एक काका आहेत त्यातल्या काकांना इटालियन येते म्हणून या अनोळखी खेळाडूच्या फोनमध्ये तोंड घालून ते ही मोठ्याने बोलताहेत. त्यांना बघून ते काका आठवलेत. मध्येच खेळाडूने काकांना टाळीही दिली! यावरून फोनवर फुटबॉल चालू आहे असं वाटतंय.

समोरच्या दुसऱ्या सीटवर मध्यमवयीन सायकलिस्ट आहे. तिला बघून ती ताई आठवली आहे. तर तिने ट्रेन सुरू व्हायच्या आत बॅग उघडून भराभर सामान बाहेर काढून मि. बीन्स च्या स्टाईलने सँडविच करून घेतलंय. दोन घास खाऊन झाल्यावर तिला आठवलं की हातच बाही धुतले. मग ते सँडविच तसंच एका पेपरवर ठेवून ती चपला,मोजे न घालता टॉयलेटमध्ये हात धुवायला गेलीय. तरुण खेळाडू एकीकडे फोनवर बोलत दुसरीकडे काकांना आवरत तिसरीकडे त्या उघड्या सँडविचकडे बघतोय!! याला बघून तो मित्र आठवलाय!
त्याच्या शेजारच्या आडव्या सीटवर एक महिनाभराच्या बाळाला घेऊन दोन स्त्रीया बसल्यात. एक पन्नाशीची आणि दुसरी अजून थोडी मोठी! ती,ती किंवा ती सोबत असती तर या बायका बाळाची आई की आजी की अजून कुणी अशी पैज लावायला मजा आली असती !
मागच्या बाजूला चार आजी डुलक्या घेत बसल्यात. त्यांच्या सामानावरून कुठलीतरी हाईक करून आल्या असाव्या असं वाटतंय. सकाळी पण असाच एक रंगीबेरंगी कपडे शूज, मॅचिंग कानात गळ्यात घातलेल्या हातात काठ्या घेतलेल्या पाच सहा आजींचा ग्रुप भेटला होता. आमच्या पोरीला त्यातल्या दोघींच्या अलमोस्ट नाचत गाणं म्हणून दाखवलं म्हणून खूप मजा आली!
तर या बायका बघून अजून 25 वर्षांनंतरच्या कुठल्यातरी पर्वतरांगा ओलांडायला जाणाऱ्या माझ्या मैतरणी आठवत आहेत! त्यातली 4 नावं पक्की आहेत पण उरलेल्या दोन आता काहीच व्यायाम करत नाहीत म्हणून बाद केल्यात !!!
बाकीच्या जागा फोनला चिकटलेले तरुण तरुणी आहेत आणि झुरीक आलं आहे!

१२ ऑगस्ट २०२१

कुरणांमधलं घर ४

प्रिय,

या देशातला पहिला उन्हाळा रमतगमतच चालला आहे. अधूनमधून येणारा पाऊस आणि अधूनमधून येणारे स्नेही यांच्यामुळे सगळं आल्हाददायक आहे.
इथला पाऊस वेगळाच आहे बघ. समोर टेकड्या दिसतात ना तिथं कबड्डी खेळणाऱ्या मुलांसारखे ढग जमा होतात. दोन बाजूला दोन संघ. त्यांचा तो विशिष्ट 'सलेटी' रंग चढेपर्यंत व्यूहरचना चालू असते. आणि मग कडकन एखादी वीज चमकते आणि सामना सुरू होतो! गडगडाट काय लखलखाट काय कडकडाट काय काही विचारू नको ! प्रत्यक्ष पाऊस पडतो त्यापेक्षा तिप्पट हा गोंधळच जास्त ! रात्र असली तर हे अजूनच रौद्र दिसतं. समोरची काळूबाई हॉरर सिनेमात केस सुटलेली हडळ दिसावी तशी हुबेहूब दिसते! झाडांचे डोळे विचित्र चमकत राहतात, तळी, डबकी दोन्ही कोपरं दुमडून बारीक डोळ्यांनी बघणाऱ्या मांजरासारखे दिसायला लागतात..
दिवस असेल तर पाऊस टेकड्यांवरून लोळण घेत आमच्या गावावर येताना दिसतो !
इथं हवामानाचा अंदाज बहुतांशी चुकत नाही. सगळ्या लोकांना तो बघूनच कामं ठरवायची सवय असावी. आम्हाला बऱ्याच गोष्टी लोकांकडूनच कळतात. लख्ख ऊन असतानाही रेनकोट घालून बाहेर पडणारी माणसं, झिमझिम पावसात सायकली काढणारे लोक, ढग आलेले असताना वेग वाढलेल्या गाड्या यातून हवामानाचा अंदाज गुगलपेक्षा जास्त चांगला समजतो असं आपलं माझं मत !
परवा दिवसभर बाहेर जायचं होतं म्हणून सकाळी कपडे वाळत घालायला गॅलरीत स्टँड मांडत होते. समोरच्या इमारतीतली आजी आणि शेजारच्या इमारतीतल्या काकू दोन दा डोकावून भुवया उंचावून गेल्या गेल्या. याला म्हणलं आज नक्की पाऊस असणार आहे जरा बघ तर खरंच संध्याकाळी पाऊस लिहिलेला होता !
आमच्या लहानलहान सहलीपण चालू झाल्या बरं का! परवा इथल्या एका रिगी नावाच्या शिखरावर जाऊन आलो. पूर्ण प्रवास एवढा देखणा! पर्वताच्या पायथ्याशी विशाल जलाशय आणि त्याच्या काठावरची समृद्धीच्या खुणा मिरवणारी गावं. निसर्गाला थेट भिडून हट्टाने तिथंच राहणारी माणसं मला नेहमीच शूर वाटतात. अंगणाच्या पायरीवरून तळ्यात पाय बुडवता येईल अशी घरं बघताना ठळकपणे लक्षात येत होती ते चर्चचे मिनार ! कितीही लहान गाव असलं अगदी पाच घराचं तरीही तिथं सुंदर सुबक चर्च आहेच.
खरं तर त्या आठवड्यात वादळामुळे पुराचा इशारा होता. आम्ही जाणार त्या दिवशी पाऊस नव्हता म्हणून निघालो खरं. रेल्वे,बस आणि मग इथली प्रसिद्ध आपल्या माथेरान शिंमल्याला असते तशी छोटी झुकगाडी जी थेट शिखरावर घेऊन जाते त्यात बसलो. वर जाताना समोरच्या सीटवर एक पंचाहत्तरीची आजी बसली होती. ती एकटीच दर उन्हाळ्यात रिगी फिरायला दर आठवड्याला येते म्हणे! कुठून फोटो छान येतील, पुढे काय आहे असं सांगत होती. झरे,डोंगर,नदी,डोंगरातली एकांडी घरं, गायी हे सगळं नव्याने बघितल्यासारखी कौतुकाने बघत होती. आणि अचानक ओह नो आलं तिच्या तोंडून ! म्हणे तुमचं नशीब असेल तर ऊन पडेल आणि तुम्हाला वरून सगळं सुंदर दृश्य दिसेल ! ती असं का म्हणत होती ते रिगीला उतरल्यावर कळलं. एवढे दाट ढग होते की अक्षरशः 10 फुटांच्या पुढचं काहीही दिसत नव्हतं! वर चढत जावं लागतं तिथं दोन बाण दोन चित्रांनी दाखवले होते. एक रस्ता तरुणांनी चढण्याचा तीव्र चढ असलेला पण कमी अंतर असलेला आणि एक म्हाताऱ्यांनी कमी चढाचा पण जास्त अंतराचा ! किती लहान सूचना खरं तर ! ते सांगताना एवढी गोड कल्पकता ! आम्हाला घाई नव्हतीच आणि आम्ही दोन्ही गटात मोडत नाही अशी सोबत्यांची खात्री असल्याने म्हातारा रस्ता निवडला! समोर काहीही दिसत नसताना ढगात तरंगून खाली आलो !
मित्रमंडळी सोबत होती,रस्ता सुंदर होता आणि खाऊ जवळ होता म्हणून खूप मजा आली! मंजिलसे भी हसीन रास्ते वगैरे म्हणत खाली उतरलो. जवळपास 3 वर्षांनी एका भारतीय रेस्टोरांतमध्ये भरगच्च थाळी घेऊन जेवलो !!! अजून किती सुंदर व्हावी सहल !!
हां तर लोकांबद्दल सांगत होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे लोक आत्ममग्न आणि संवेदनशील दोन्ही एकाचवेळी असतात असं सतत वाटतं. रस्त्यावर दिसलेली गोगलगाय कुणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून उचलून बाजूला ठेवणारी बाई बघितली असा एकच प्रसंग नव्हता.
रविवारी सायकलवर चक्कर मारायला ग्लाटच्या काठाने निघालो. हवा छान असल्याने बरेच लोक फिरायला आलेले होते. गाव संपून शेतं सुरू झाली. बहुतेक शेतांमध्ये आज उद्या कापणीला आलेली पिकं वाकून उभी होती. काही ठिकाणी नुकतीच कापणी झाल्याने उरलेल्या धांडांचा वास हवेत तरंगत होता. जिथं कुठं जरासा उतार असेल तिकडं पावसाचं पाणी धावत जाऊ बारके बारके झरे खेळत होते. नदी खळखळत वाहत होती. लख्ख ऊन पडलं होतं. एवढ्यात समोर अचानक भरगच्च फुललेलं सुर्यफुलांचं शेत आलं !
सूर्यफुलं आनंद उधळतच फुलत असतात. सुगंधासारखा आनंदही आपोआप त्यांच्या आजूबाजूला पसरतो! रस्त्यावर चालणारे अनोळखी लोकही आम्हाला अतिशय आनंदाने हाय हॅलो करत जात होते.
मोह आवरला नाही म्हणून सायकली थांबवून फोटो काढायला सुरुवात केली. तेवढ्यात अजून एक पन्नाशीचं जोडपं फिरत आलं आणि त्यांनीही फोटो काढायला सुरुवात केली.
त्यातली बाई कौतुकाने प्रेमाने सुर्यफुलांकडे बघत होती ते एवढं छान दिसत होतं! मी तिला म्हणलं किती सुंदर आहेत नाही फुलं ! ती सहज म्हणाली ,"हो ना, प्रत्येका फुलाचा चेहरा किती वेगळा, आणि ती किती वेगवेगळ्या आनंदात आहेत !!!" तिच्या या वाक्यामागे काय नव्हतं! समाधान होतं, कुतूहल होतं, जगण्याची असोशी होती, अपार प्रेम होतं आणि मुख्य म्हणजे हे सगळं बघता येतंय याबद्दल कृतज्ञता होती !
हे ऐकणं,उमगणं हा त्या दिवसातला सर्वात आनंदाचा क्षण होता!
वेगळ्याच तंद्रीत निघालो तर आत्ताच आम्हाला ओलांडून वेगात गेलेल्या दोन सायकलस्वारांना थांबलेलं बघितलं! त्यातली बाई उतरून एक मोठं पान घेऊन आली आणि काहीतरी उचलून रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाखाली ठेवून त्यावर थोपटून सायकलकडे आली. कुतूहल म्हणून मी बघायला गेले तर रस्त्यावर मरून पडलेला एक उंदीर तिने उचलून बाजूला ठेवला होता. त्यावर पानं झाकली होती आणि त्याला थोपटून ती निघाली होती!
कुठून येते ही सहवेदना ? समृद्धीच्या पुढे येत असावी.
छोटं गाव, त्याला लागून भली मोठी शेतं, कुरणात चरणाऱ्या शेकडो गायी, त्यापुढे लगेचच विमानतळ आणि त्यावरून उडणारी लहानलहान विमानं, लहानलहान पण अतिशय सुखद रस्ते, वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात असणारे लहानसहान कारखाने ही समृद्धी या देशाने कशी कमावली असेल??
अशी माणसं आणि अशी दृश्य दिसली की या लोकांचा हेवा वाटतो. यातलं आपण काय करू शकतो असं मनात येतं आणि स्वप्नं पडायला सुरुवात होते.

५ ऑगस्ट २०२१


















पाकपुरी

लहानपणी गोड फारसं आवडायचं नाही. पुरणपोळी या प्रकाराचा तर भयंकर कंटाळा यायचा. ज्या कुणी नैवेद्यासाठी पुरणपोळी हा पदार्थ ठरवला त्यांच्याकडे फक्त आणि फक्त हरबरा डाळच पिकत असणार यावर कसा विश्वास ठेवायचा म्हणे! घरात दूध दुभतं भरपूर असूनही गेल्या पंधरा वीस वर्षात मराठी स्वयंपाक घरात शिरलेले रसमलई, रसगुल्ले, रबडी इ पदार्थ तेव्हा नसायचे. श्रीखंड,बासुंदी, गुलाबजाम, जिलबी ऋतूनुसार व्हायची किंवा अगदी थोरल्या सणांना किंवा अगदी महत्वाच्या पाहुण्यांना! मग वर्षभरात येणाऱ्या त्यामानाने धाकट्या सणवाराना,सहज आल्यागेल्याला खाऊ म्हणून कणकेचा शिरा, रव्याचा शिरा, हातशेवईची खीर, साखरभात,कसले ना कसले लाडू, यांच्या ओळीत पुढे असायची पाकपुरी ! हे कुठलेही पदार्थ रीत म्हणून खायचे असं असायचं! आवड म्हणून फक्त श्रीखंड ! असं करूनही दर वेळी आई तेवढ्याच उत्साहाने करायची आणि आम्हाला खायला लावायची!

आमचं संघकार्यकर्त्याचं घर असल्याने घरी सतत माणसांचा राबता असायचा. आठवड्यात सरासरी चार माणसं बटर जेवायला असायचीच. कधी कधी त्यात अनेक दिग्गजही असायचे. आमच्याकडे सगळ्यांना निःसंकोचपणे इच्छाभोजन असायचं. आमंत्रण अण्णांनी दिलं असलं तरी नंतरचा विषय आई हातात घ्यायची. सरळ पाहुण्यांना विचारायची की तुम्हाला काय जेवायचं आहे! ते म्हणाले पिठलं भात तर पिठलं भात,ते म्हणाले खीर पुरी तर खीर पुरी! अजून एक म्हणजे जेवायला बसल्यावर ओ येईपर्यंत किंवा खाणाऱ्यांना अगदी नको होईपर्यंत आग्रह करायची पद्धत आजही आमच्याकडे नाही. जेवणाराने हसतखेळत मन-पोट भरेल एवढं जेवावं, त्यात आग्रह मानपान वगैरे फालतू गोष्टी आणू नयेत ही रीत मीही माझ्या घरी पाळते.
एकदा घरी प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त येणार होते. त्या काळी गोट्या ही त्यांची मालिका फार आवडती असायची. एवढा दिग्गज माणूस आपल्याकडे जेवायला येणार म्हणल्यावर काहीतरी भारी मेनू करावा असं आईला वाटत होतं. पण नेहमीप्रमाणे त्यांनाही हा प्रश्न गेला की ! ते म्हणाले तुम्हाला पिठल्याच्या वड्या येतात का? आणि पाकातल्या पुऱ्या?? ही फर्माईश बघून आई हसायलाच लागली! शेवटी इच्छाभोजन महत्वाचं. आमच्या घरात चार जणांच्या डायनिंग टेबलवर बसून राजदत्त पिठल्याच्या वड्या, पाकपुऱ्या आणि भरीत भाकरी खात आहेत हे चित्र मनावर एवढं कोरलं गेलं की तेव्हापासून चक्क पाकपुऱ्या ग्लॅमरस वाटू लागल्या! पुढे ही पुरी माझ्या आवडीच्या पदार्थात जाऊन बसली.
आज असेच एक मोठे पाहुणे घरी यायचेत तर आईची आठवण काढत, सासूबाईंकडून रेसिपी तपासून घेऊन पाकपुऱ्या केल्यात!
पाहुण्यांना आवडणार आहेतच! पण आईला पण या खूप आवडल्या असत्या !
तुम्हाला सांगू का कृती?
वाटीभर कणिक असेल तर पाव वाटी बारीक रवा घ्यायचा. दोन्ही मिसळून किंचित मीठ घालून अगदी चमचाभर तुपाचं मोहन घालायचं. त्यात आंबट ताक किंवा दही घालून घट्ट मळून गोळा अर्धा तास मुरू द्यायचा.
मग एकीकडे वाटीभर साखर थोडं पाणी घालून एकतारी पाक करून घ्यायचा. पहिली उकळी आली त्यातच केशर, वेलची घालून दुसरी उकळी आली की गॅस बंद करायचा.
आता लहान लहान पुऱ्या लाटून तेलात तळून गरम असतानाच पाकात घालायच्या. दुसऱ्या घाण्यातल्या पुऱ्या तळत आल्या की आधीचा घाणा पाकातून काढून तिरक्या निथळत ठेवायच्या.
सगळ्या पुऱ्या झाल्या की हवी तर सजावट करायची आणि खायला घ्यायच्या.
या पुऱ्या शिल्लक राहिल्या तर फ्रिजमध्ये आठ दिवसही उत्तम राहतात.
वेळप्रसंगी पंगत असेल त्याच्या दोन दिवस आधी करून ठेवल्या तरी पाकात मुरलेल्या पुऱ्या अजून मस्त लागतात.
सोपी आहे ही कृती. पाकात साखरेच्या ऐवजी मीठ घातलं तरच फक्त बिघडेल!

२५ जुलै २०२१




Its life you know...

 या घरात रहायला आल्याबरोबर सर्वात जास्त आवडली होती ती बाल्कनी ! एका बाजूला रोजमेरी अस्ताव्यस्त वाढलेली तिच्या खाली चार फुलझाडं लावण्यापुरतीच जागा आणि दुसऱ्या बाजूला एक खूप शेवाळलेलं एकही पान नसलेलं झाडाचं खोड! ते झाड कशाचं असेल याचा अंदाज लावत बसायचो आम्ही!

ती वसंताची सुरुवात होती. हळूहळू झाडाच्या फांद्या रूप बदलू लागल्या. काड्यांना डोळे आले. कोवळी पोपटी पानं चक्क कडुनिंब आहे असं म्हणू लागली.
मग एक दिवस पानं मोठी होऊन तुऱ्यांसारख्या काड्या वर आल्या आणि त्यांना घोसाने कळ्या लगडल्या. सध्या हे सोनसळी रूप दिवसरात्र सोबत आहे. याचं नाव काय म्हणून गुगल केलं तर याचं नाव चक्क 'प्राईड ऑफ इंडिया' असं निघालं आहे! यालाच गोल्डन रेन ट्री पण म्हणतात. आम्ही आपलं सोनमोहर नाव ठेवलं !
त्यावर शेकडो मधमाशा आणि भुंगे अखंड सूर लावून घुमत असतात. खालचा लालू बोका त्या भुंग्याची शिकार करायला म्हणून सरसर वर चढून येतो आणि आमच्या बाल्कनीत मुक्काम ठोकून बसतो. दुपारची वेळ चिमण्यांची असते. त्या वेळी मात्र भुंगे येत नाहीत.
गंमत म्हणजे एवढं लख्ख ऊन पडूनही खोडांवरच्या शेवाळाच्या छटा तशाच आहेत.
परवाच्या वादळात इथं खूप नुकसान झालंय. मागच्या आवारातली मोठी बाभळीसारखी आणि आपट्यासारखी दिसणारी झाडं मुळापासून उन्मळून पडलीत.
आल्याबरोबर या जागेला आपलं म्हणावं असं ज्यामुळे वाटलं तो वडीलधारा पंचवीस तीस वर्षांचा लिंडन मुळापासून उन्मळून पडला ते बघून दोघांनी आवंढा गिळला!
परवा शेजारणीशी गप्पा मारताना त्या झाडांबद्दल विशेषतः लिंडनबद्दल हळहळत होते तर तिलाही तेवढंच दुःख झालेलं! एक मोठा सुस्कारा सोडून it's life you know...! एवढंच म्हणाली ती.
घरात आलं की हा सोनमोहर दिसतो, त्याच्या आडून पाहिलं की उन्मळून पडलेली झाडं दिसतात. त्या झाडांच्या हिरव्या भिंतीला भगदाड पडल्याने एरवी न दिसणाऱ्या दूरच्या टेकड्या दिसतात. याचा आनंद वाटला तर अपराधी वाटतं. पारवे चिमण्या अजूनही त्या आडव्या पडलेल्या झाडांवर नांदताहेत त्यामुळे शक्य असेल तितके दिवस ती झाडं उचलून त्याची लाकडं करू नयेत असं वाटत राहतं.
दारातला लिंडन पण अजून उचलला नाही. सावली नाही, कळ्या फुलांचा सुगंध नाही तरी त्यावरही अजून पाखरं बसतात.
त्याच्या मूळखोडाचा चार हाताच्या कवेत मावणार नाही एवढा पसारा बघताना शेजारी असलेला बाळ लिंडन दिसतो.
आणि शब्द आठवतात, Its life you know...!

२२ जुलै २०२१






कुरणांमधलं घर ३

प्रिय,

या नोंदीला थोडा उशीरच झालाय. संसार मांडणं सुरू होतं. आता इथलं घर भरून गेलंय. कपाटं,बैठक,पडदे,टेबल खुर्च्या सगळा पसारा पुन्हा एकदा मांडला. जे घर आपल्याला मिळतं त्याला आपली ओळख देणं हे एवढं मोठं व्यापाचं काम असतं हे कितव्यांदा तरी पटतंय. मनासारखं घर लावेपर्यंत घरातले रिकामे भिंती कोपरे आता काय बरं करणार ही असं कुतूहलाने बघत असतात त्याचा नाही म्हणलं तरी वैतागच येतो.
परवा पासून नेटाने सकाळी व्यायाम करायला सुरुवात केली. आता ओळखीच्या झालेल्या वाटा निवडताना मनात प्रश्न नसतो. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांच्याकुरणांच्या मधून फिरायचं की नदीच्या पाण्याबरोबर चालायचं एवढंच ठरवायचं असतं. दोन्ही नकाशे सरळ असले तरी मनात लपलेली मांजरीची पिलं इथं वाकून बघ,तिथं वळून बघ,इकडं चढ तिकडं उतर करत चाळीस मिनिटांचा फेरफटका तासाभराचा करतातच!
जराशाच उंच टेकाडावर असलेल्या घरातून उतरून सरसर उतारावरून डावीकडे वळलं की एक मोठा रस्ता लागतो. तो ओलांडून पुढं गेलं चक्क दोनचार एकर शेत आहे! शेत ओलांडलं की घरांची एक रांग की लागलीच क्रिसबाख नदी!
खरं तर ओढा म्हणावा एवढीच लहान आहे ती. जरा पाऊस पडला की आजूबाजूच्या डोंगरातलं पाणी खळखळ करत हिच्यात येतं की फुगूनच जाते ही! एरवी नितळ पाणी असतं पण एक जोरदार सर आली हिचा नदीभर चहा होतो! माझं येताजाता नीट लक्ष असतं हिच्याकडे. आधी लहान लहान वाटणारी शेवाळाची आणि कसल्या कसल्या पाणगवताची बेटं आता वाहत्या नदीत हिरवी लुगडी प्रवाहाबरोबर झुळझुळावी तशी दिसतात. एका गवताला तर चक्क सुंदर पांढरी फुलं आलीत. त्या नितळ पाण्यात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू पाहणारी बदकं बघणं फार मोठा विरंगुळा असतो!
तसंच पुढं गेलं की मागे तुला दाखवलं ते रापसीडचं शेत. ती पिवळी फुलं संपून शेंगा आल्या आणि त्याही आता पिवळ्या पडायला सुरुवात झालीये. थोड्याच दिवसात कापणी होऊन तेल तयार करायला घेऊन जातील. मग थंडी सुरू व्हायच्या आधी तिथं अजून काही लावतील का असं मला कुतूहल.
त्या शेताला लागून एक जंगल आहे. पलीकडच्या गावाला जायचा शॉर्टकट. एवढ्या दाट निर्मनुष्य जंगलात शाळेची पोरं, पोरीबाळी, म्हातारे यांच्या निर्भय सायकली ये जा करताना बघून इथल्या सुरक्षिततेचा हेवा वाटला.
नदीकाठ न सोडता काल अजून दोन किलोमीटर पुढं गेले. आमचं गाव बहुदा संपलं असावं. रस्त्यावर तुरळक पळणारे मुलं मुली,कुत्री फिरवायला आलेले लोक आणि शेतात कामाला सुरुवात करणारे लोक. कसली कसली यंत्र घेऊनच शेती करतात हे लोक. मी आपलं निंदणीला आलेल्या बाया कुठं दिसतात का बघत होते!
हां तर इथं हा भाग घरांचा आणि हा शेतीचा अशी काही वाटणीच नाही. घरांच्या ओळी बघत तुम्ही जात असता. मध्येच बंगले,साधी वाटावी अशी कौलारू घरं, मधेच तीन मजली अनेक बिऱ्हाडं असलेल्या इमारती, त्यांच्यासमोर राखलेल्या बागा, भोवताली आवर्जून वाढू दिलेली अस्ताव्यस्त झुडुपं, काही घरांमध्ये चक्क स्वतःची तळी त्यात पाळलेली बदकं, पाणकोंबडे वगैरे हे बघता बघता अचानक शेत सुरू होतं!
शेतात गहू,सोयाबीन,बार्ली नाहीतर ओट्स चक्क.
ती एक गंमत सांगते. गहू ओळखू आला, बार्ली गुगलवर बघून समजली पण ओट्स मात्र कळत नव्हते. ओट्स एवढ्या आवडीने खाणारी मी पण ओट्सचं शेत कसं असेल याचा कधी विचारच केला नव्हता. तर मी वाकून पान तोडून,ओंब्या तोडून,हातात घेऊन चोळून वास घेऊन परेशान होत असलेली बघून चालायला आलेलं एक जोडपं काळजीने जवळ आलं. त्यातली स्त्री मी बरी आहे ना,माझं काही हरवलं आहे का असं विचारू लागली. मी हे शेत कशाचं आहे हे विचारल्यावर त्यांचे चेहरे वैतागलेच! "ओट्सचं शेत आहे हे " एवढं उत्तर फेकून मारल्यासारखे करत दोघेही तरातरा पुढं निघून गेले! यात एवढं वैतागण्यासारखं काय होतं काय माहीत!
पण ओट्सचं शेत हे नवं नवल होतं खरं!
तसंच नवल परवा गेलेल्या सहलीत सापडलं. भलं मोठं शेत त्यात वांग्याची नाहीत,भोपळ्याची नाहीत,भेंडीची नाहीत अशी रोपं. रस्ता सोडून चिखलात पाय घालत पुढे जाऊन बघितलं तर कुरजेट( झुकीनी) ! कुर्जेटाचं शेत म्हणल्यावर मजाच वाटली!
मेकलीनला असताना घरासमोरची झाडं अक्रोडाची आहेत हे समजल्यावर वाटलं होतं तेवढंच नवल आणि आनंद प्रत्येक नवं झाड पीक समजल्यावर होतो.
त्यावरून आठवलं, इथं घराच्या खाली माझा लाडका लिंडन, चेस्टनट आणि मागच्या कोपऱ्यात छोटं का होईना अक्रोडाचं झाड आहे हे समजल्यावर कुणीतरी ओळखीचं आजूबाजूला आहे असं वाटलं.
या नदीकाठच्या रस्त्यावरसुद्धा तीन मोठमोठी अक्रोडाची झाडं आहेत. कुणाच्या मालकीची नसावीत. त्यांना यंदा चांगलाच बहर आहे. कालपरवा झालेल्या वादळात छोटे कच्चे अक्रोड गळाले ते मात्र वाईट झालं. आता अजून दीड दोन महिन्यात अक्रोड पिकून गळायला लागतील तेव्हा इथं येऊन गोळा करेन.
घरी परतताना घराजवळच्या शेतावरून आले. अर्ध्या भागात गहू आहे आणि अर्ध्या भागात बीटरूट. गहू उगवला2तेव्हाच ओळखू आला होता पण बीटरूटला मात्र पालक समजले होते. आता पानं मोठी होऊन दांड्या लालसर दिसल्यावर बीटरूट आहे असं समजलं. वाहता रस्ता, घरांच्या गर्दीत मधेच असं शेत असून त्याला कुंपण नाही हे बघून पुन्हा नवल वाटलं.
सध्या इथल्या सुंदर घरांची कुंपणं गुलाबांच्या वेलींनी बहरली आहेत. आवर्जून लावलेले लावेंडर जांभळ्या सुगंधाने हवा हलकी तरल करतात.लिंडन ऐन बहरात असल्याने कुणाकडेही लक्ष न देता फक्त लाखो फुलं उधळत राहतो. रस्त्यावर सकाळी सकाळी चालताना ढबु गोगलगायीचे रात्रीतून स्थलांतर करणारे पण अर्धाच रस्ता पार करू शकलेले तांडे चुकवत चालावं लागतं.
अशी कसरत करत आपण चालत असतो आणि एका ठिकाणी एक मावशीबाई गोगलगायीच्या अख्ख्या तांड्याला कसल्याश्या भल्यामोठ्या पानावर अलगद उचलून रस्त्याच्या काठाला नेऊन सोडताना दिसते. तो क्षण तुम्हाला उजेड देऊन जातो. घराजवळ आलं की घाईघाईने ऑफीसला निघालेली सुटबुट टाय बांधलेल्या शेजारीण चार पावलं मागं येऊन पर्स बाजूला ठेऊन नळ सुरू करून आज कडक ऊन असणार हं असं तुम्हाला सांगत सगळ्या सार्वजनिक रोपांना पाणी शिंपडून मग कामाला निघते! पोस्ट बॉक्स मध्ये लेकीने खालच्या आजोबांच्या अंगणात टाकलेले कंगवे, चेंडू त्यांनी आणून ठेवलेले असतात. जिन्यापाशी एक शेजारीण तू माझ्या मुलीला इंग्रजी शिकव आणि तू तिच्याकडे जर्मन शिक असं आवर्जून सांगते. दिवस असा सुरू व्हावा.
संध्याकाळी गच्चीवर बसून समोर सूर्यास्तानंतर दिसणाऱ्या टेकड्या बघताना मनात म्हणलं जगभरात कुठंही गेलं तरी डोंगर, आभाळ, पाऊस, माती,नदी आणि झाडं आपल्याला तेवढ्याच सहृदयतेने भेटतात हे किती चांगलं आहे ना!!!

१ जुलै २०२१













अनोळखीपणाची ओळख

 काल ब्रेडची रेसिपी टाकली त्यावर काहीजणांनी विचारलं की बिघडला तर काय? म्हणलं पीठ,पाणी, तेल,मीठ, दूध, यीस्ट तेही सुमारे अर्धा तास उच्च तापमानात बेक झालेलं, त्यात काय बिघडणार आहे? फार तर फुगणार नाही. अशा वेळी नाव बदलायचं की झालं ! म्हणजे थोडासाच फुगला तर डेन्स ब्रेड,अजून कमी फुगला तर फ्लॅट ब्रेड,अजून कमी फुगला तर नान,अजूनच सपाट झाला तर कुलचा आणि सपाट कडक झाला तर खाकरा म्हणायचं त्याला की झालं काम !

🤗
तसंही पातळ पोह्यांचा उपमा, बिर्याणीची खिचडी, चटणीचं सूप, कढीचं पिठलं हे काही आपल्याला नवीन नाही 😎
यावरून काहीतरी आठवलं ते सांगते.
लग्न झाल्यापासून नवऱ्यानं असं जुळवून घ्यायला शिकवलंय मला! विशेषतः खायच्या गोष्टीत.(तसंही ते पटकन शिकलं जातं म्हणा😁)
एकदा तो हॉंगकॉंगला राहत असताना त्याच्याकडे गेले होते. तिथं भाषेचा आनंद असल्याने तसंही खाणाखुणाच करायच्या तर इंग्रजी कशाला फाडा म्हणून आम्ही हातवारे करत मराठीतच बोलायचो. पण ती गोष्ट पुन्हा कधीतरी!
तर बाजारात भाजी आणायला गेलो त्याला विचारलं इथं हिरवी भाजी काय खातोस? तो म्हणे ते बघ हिरवा पाला भरलेल्या सहा टोपल्या आहेत. तर मी दर वेळी पुढच्या टोपलीतली भाजी घेतो. मी म्हणलं,ते ठीक आहे पण ती भाजी कशी करायची ते कसं शोधतोस? तो म्हणे मी नाही शोधत. मी त्या भाजीचं नाव पालक ठेवतो आणि करतो !!!!! 🙀
या साक्षात्कारी प्रसंगानंतर मन एकदम मुक्त का काय झालं माझं ! सगळ्या अनोळखी भाज्या,फळं,कडधान्ये याबद्दलचे राग लोभ निमाले ! मनात कणभरही शंका उरली नाही. सर्व शाकाहारी पदार्थाना आमच्या घराचं दार सताड उघडं झालं. ज्या अर्थी खायच्या रॅकवर गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि माणसं त्या विकत घेऊन जाताहेत त्या अर्थी त्या गोष्टी आपण खाऊ शकतो एवढं साधं गणित!
आता मला विटलोफ, ब्रोकोली, कुर्जेट,कोको बीन्स, स्विस चार्ड,लीक,टर्निप,अस्पारागस,पार्स्निप,पाकचोय,ब्रुसेल्स स्प्राऊट्स अशी कुठलीही भाजी करताना मनात शंका येत नाही.
परवा पहिल्यांदाच र्हुबार्ब आणले. भाजीवालीला विचारलं याचं काय करतात? ती म्हणे केक,जॅम,ज्यूस ! चक्क अळूच्या देठासारखं दिसणारं ते प्रकरण इथं फळ म्हणून खातात याची गंमत वाटली. घरी येऊन चाखून बघितलं तर चक्क ठार आंबटपणा! मग त्याचा छान चिरून हिंग गूळ मेथ्या घालून शिजवून मेथांबा झाला की ! पुढच्या वेळी त्याला म्हणणार र्हुबार्ब असशील तुझ्या घरी! आज तुझं नाव चुका !आणि मग त्याचं वरण करणारे 😋
आपल्याला काय, कोणतीही भाजी डोळे वटारून बघू दे आपण म्हणायचं,ए बाबा, कुर्जेट असशील तुझ्या घरचा,आज तुझं नाव घोसावळं !!! 😄😄

तुम्हाला सांगते, परदेशी लोकांशी बोलताना त्यांच्यात मिसळताना आधी अशीच 'अनोळखीपणाची' भीती असायची. मग हळूहळू सगळीकडे माणसं सारखीच असतात कळायला लागल्यावर मी आता मनातल्या मनात इजाबेलचं नाव ईशा, मार्गारेट काकूंचं नाव शैलामावशी, अलीसियाचं सिया, हेन्रीकचं रामकाका असं ठेऊन देते. आणि मग मैत्री सोपी होते !!!!

😊

२१ जून २०२१

कुरणांमधलं घर २

प्रिय,

नव्या देशातल्या या नव्या गावाची आता चांगली ओळख झाली आहे. गुगलवाल्या आक्का रस्ता सांगताना काहीही म्हणत असल्या तरी अरे हा शॉर्टकट आहे चल तिकडून असं आत्मविश्वासाने सांगत गावभर फिरता येऊ लागलं आहे ! सार्वजनिक वाहनांचा पास घेतल्याने जवळपासच्या गावांमध्ये फिरणं सुद्धा फारच सोपं झालंय.
परवा अशीच चालायला म्हणून बाहेर पडले तर पाच मिनिटांत धोधो पाऊस आला! समोरच बसस्टॉप होता तिथे त्या क्षणी आलेल्या बसमध्ये बसले. आमच्या घरातून डोंगर दिसतो त्यात मध्येच येणारी काळुंद्री उंचच्या उंच इमारत आहे. काहीतरी सुपर पॉवर अंगात यावी आणि मी नुस्त्या टिचकीने ती इमारत पाडून टाकावी असे विध्वंसक विचार अनेकदा मनात येतात त्याचं कारण म्हणजे या इमारतीमुळे पलीकडच्या टेकडीवर असलेली गावं दिसत नाहीत. तर ही बस त्या इमारतीला वळसा घालून मागून एक रस्ता जातो तिथून ष्टेटबाख नावाच्या भागात जाते असं वाचून समजलं! शेवटच्या स्टॉपला उतरले आणि बाहेर इकडेतिकडे बघते तर हर्षवायूच झाला मला !!!! त्या काळुंद्री इमारतीच्या आड लांबवर डोंगरात जाणारा नागमोडा रस्ता आणि कुरणं आणि खेडी दिसतात तिथं उतरले होते मी !
पाऊस पूर्ण थांबेपर्यंत नकाशावर जवळच एक भारतीय दुकान आहे असं दिसलं म्हणून शोधत निघाले तर ते अगदी पाच मिनिटांत आलं. सत्तरीचा श्रीलंकन मालक मस्त बोलघेवडा निघाला. खरंखोटं सांगत असेल पण म्हणे पस्तीस वर्षांपूर्वी मी इथं आलो आणि नोकरीच नाही मिळाली म्हणून इथला घर जावई झालो !!! एकंदर दुकानाचा आकार अवतार बघता पस्तीस वर्षात याला फार सासुरवास झालाय हे दिसतंच होतं! ते काहीही असलं तरी यांच्याकडे ताजा कढीलिंब, शेवगा, नारळ,सुरण,इडली राईस आणि हिरवी मिरची मिळते यानेच खुश होऊन शेजारी त्याच्याच टपरीवजा हॉटेलातून चटणी वडे घेऊन निघाले.
अजूनही पाऊस थांबायचं नाव घेईना म्हणून तिथेच कोपऱ्यावर टेकडी पायथ्याशी असलेल्या रापसिडच्या पिवळ्या धम्मक रानाला उद्या येतेच त्याला घेऊन असं सांगून उलट बसने परत आले.
घरी येऊन नवऱ्याला एवढं कौतुक ऐकवलं की दोनचार दिवसांनी पाऊस थांबल्या दिवशी गुगल मॅप अडीच km तर सांगतोय असं म्हणत त्याने सायकलीच काढल्या ! पोरीला सायकलवर अडकवून दहा मिनिटात पोहोचलोसुद्धा !
एकीकडे हिरवीगार गव्हाची शेतं आणि दुसरीकडे सोनसळी रापसीड ! मधूनच वाहणारे बर्फगार पाण्याचे झुळुझुळ पाट, त्यावरचे साकव आणि याला मुकुट म्हणून चढत गेलेल्या टेकड्यांवरून लांबवर दिसणारे शुभ्र आल्प्स! टेकडीवर कुरणं म्हणून सोडलेली माळरानं जास्त आणि शेतं कमी आहेत. सगळीकडे मेंढ्या आणि इथल्या सुप्रसिद्ध ढबऱ्या गायी गळ्यात तशाच ढबऱ्या घंट्या घेऊन चरताना दिसतात.
हे सगळं चित्र कागदावर असावं आणि एका रेषेत तो कागद संपावा तसं रस्ता ओलांडला की रेल्वे स्टेशन, उंच इमारती, मॉल आणि दाट वस्ती सुरू !
तरीही त्या गायी मेंढ्या बघायला पुन्हा पुन्हा नियमित यायची जागा असं ठरवून टाकलं!
सलग सुट्टी आली तेव्हा झुग नावाच्या गावी अमोहाला झुकगाडीत बसवायचं म्हणून मित्राकडे गेलो! पर्वतरांगा त्याखाली भलं मोठं सरोवर आणि त्याच्या काठावर मित्राचं गाव ! अग, त्याच्या घरात दिवाणखान्यात बसलं की सरोवर आणि पर्वतरांगा दिसतात! मधेमधे एकही काळुंद्री इमारत न येता! फार सुंदर सुबक गाव आहे ते. त्या तळ्याकाठी सुंदर बागा आहेत तिथं सिनेमात घुसून फिरून यावं असं फिरून आलो. मी सांगितलं नाही तर खुशाल ते फोटो म्हणजे नुसते पडदे आहेत आणि त्यापुढे फोटो काढलेत असाच कुणाचाही समज होईल !
खरं अशा वेळी इथल्या मातीत इथल्या निसर्गाच्या कुशीत आपण फार विसंगत दिसतो बघ! एका चित्रावर चिकटवलेल्या दुसऱ्या चित्रसारखे! हेच खरं तर खरं असतं नाही? म्हणजे आपल्या वावरारानात काढलेले आपले फोटो आणि इथल्या शेतात काढलेले आपले फोटो यात खरे वाटणारे फोटोच आपले खरे फोटो असतात! कितीही आपण जाऊ ते आपलं घर म्हणलं तरी आपलं एक खरंखुरं घर असतं ते असतंच!
हं, इथं तुमच्यापैकी कुणीतरी या बघू ! म्हणजे इथेही घराचा अंश आलासे वाटेल. त्या पिवळ्या शेतातल्या शेजारून गेलेल्या पाटावर साकव आहे ना,तिथं बसून डबे उघडून खातपीत गप्पा मारत दिवसभर बसूया!
इथं राहून गेलेला मित्र म्हणाला गायी दिसतील त्या घरात इस्टेटीत घुसायचं बिनधास्त आणि त्यांना विचारायचं ताजं दूध आणिक लोण्याचा भाव काय म्हणून !!!
जरा थांब अजून दोन महिने, आता कुठं ही भाषा समजू लागली आहे, थोड्या दिवसात भाषा उत्कृष्ट नाही आली तरी जिव्हाळ्याच्या विषयावर आठवतील ते शब्द वापरून हातवारे करत बोलण्याएवढा आत्मविश्वास नक्कीच येईल आणि मी ताजं लोणीही आणू शकेन :))
अजून फार लिहायचं आहे पण थांबावं लागेल आता!
लिहितेच पुढच्या आठवड्यात !
तुझी
माया
1 Jun 2021