Sunday, 8 April 2012

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी (शाळेची डायरी) : ३

(या लेखात आणि यापुढेही ज्या केसेस् लिहीत आहे त्यातली नावे बदलली आहेत. त्यांच्या खाजगीपणाचा पूर्ण आदर राखण्यासाठी आवश्यक ते संदर्भही बदललेले आहेत. समस्या सारख्या किंवा अनुभवाच्या वाटल्या तरी त्यावरील उपाय मात्र व्यक्ती, वय, समाजिक, सांस्कृतिक स्तर, परिस्थिती यानुसार वेगवेगळे असू शकतात.)


विभागाची रचना छान झाली आहे. शाळेच्याच एका इमारतीतला एक कोपरा मिळालाय.स्वतंत्र समूपदेशन कक्ष ! एक टेबल, तीन खुर्च्या, एक बंद कपाट आणि अशीच अडगळीला आणून टाकलेले दोन डेस्कटॉप्स !! ( बंद तर बंद ! आमच्या हापिसात संगणक बघून बघणारे इंप्रेस होणारच की हो ! ;) ) इंटर्नी म्हणून काम करत होते तेव्हाचे दिवस आठवले.इन्स्टिट्यूटकडून पत्र घ्यायचं.कोणत्याही शाळेत जायचं, त्यांना काम करू देण्याची ( अर्थात फुकट ! ) विनंती करायची. मग ते विनंतीला मान देऊन काम तुम्हीच शोधा म्हणणार. मग काम ( व्यक्तिगत समस्या किंवा गटसत्र ) ठरले की जागेचा प्रश्न यायचा. मग कधी रसायनशास्त्राची प्रयोगशाळा, कधी चित्रकला वर्ग कधी स्टाफरूमचा कोपरा कधी एखादा रिकामा वर्ग, कधी मैदानावरच्या झाडाखाली तर कधी व्हरांड्यात सत्र घ्यायचो आम्ही सगळे. अर्थात गटसत्र घेताना फार अडचण यायची नाही पण व्यक्तिगत सत्राला मात्र स्वतःची नि सल्लार्थीची एकाग्रता अक्षरशः दोरखंडांनी बांधून ठेवावी लागायची. त्यामानाने आता एवढ्या सुविधा म्हणजे अहाहा !

माझ्यासोबत अजून दोन समूपदेशक आहेत. टीम म्हणून काम करताना मजा येतेय.

पाच वर्षात किती बदलल्यात गोष्टी ! पूर्वी आणि आता असे दोन रकानेच करायला हवेत असं वाटतंय.
पूर्वी पालक आमच्याकडे यायला तयारच नसायचे. मानसतज्ञ म्हणजे वेड्यांबरोबर काम करणारे ही धारणा खूप खोलवर रुजलेली आहे. तिची तीव्रता आता खूप कमी जाणवते. पालक स्वतः मुलांच्या अडचणी घेऊन येतात.
६वर्षांपूर्वी हाताळलेली एक केस आठवली -

एक आई आपल्या ८ वर्षाच्या मुलाला घेऊन आली. कॅम्पातल्या एका चांगल्या शाळेत शिकणारा अवि अभ्यासात मागे पडत होता. एकाग्रता कमी आहे. आळस आहे अशा तक्रारी पालक सांगत होते. अवि मजेत असल्यासारखा खोलीतली चित्र बघत होता. नजर भिरभिरत होती. हाताच्या अस्वस्थ हालचाली चालू होत्या. आई अखंड तक्रारी सांगत होती. थोड्या वेळाने मी अविशी एकट्याशी बोलले. शहाण्या मुलासारखी पूर्ण वाक्यात उत्तरे देत होता. अर्धा तास गप्पा झाल्यावरही मला नेमकी समस्या कळली नाही. नवशिकी असल्याने थोडी खट्टू झाले.

आपण आता काउन्सेलर, मग समोरच्या व्यक्तीचं मन आपल्याला लगेच कळलं पाहिजे असं वाटायचं तेव्हा. खरं तर समोरच्या व्यक्तिला विश्वास वाटणं, सुरक्षित वाटणं यासाठी लागणारा वेळ द्यावाच लागतो. तो काहीजणांसाठी एक सत्र म्हणजे ४५ मिनिटांचा असतो तर काही लोक ३-४ सत्र तुमचीच परीक्षा घेत असतात. मग मन मोकळं करतात. मुलं तर या बाबतीत जास्त चिकित्सक असतात. त्यांना तुमच्याबद्दल कशामुळे विश्वास वाटेल याचे लॉजिक तुम्ही कधीच मांडू शकत नाही...

तर अवि. अविला मी दोन दिवसांनी पुन्हा बोलवले. अखेर त्याच्या परीक्षेत मी पास झाले नि तो घडाघडा बोलायला लागला. त्यातून समजलेली माहिती धक्कादायक ( तेव्हातरी ! ) होती. त्याच्या आईबाबांचे आंतरजातीय लग्न होते. त्यामुळे सगळे नातेवाईक तुटलेले. स्वता:ला सिद्ध करण्याच्या नादात वडील पैशाच्या मागे लागलेले. आई कमी शिकलेली म्हणून आर्थिक रित्या नवर्‍यावर विसंबून. एकामागे एक झालेली ही दोन मुलं. मुलांना बाबा आठवड्यातून एखादेवेळी भेटायचे.महागडी खेळणी, बाहेर खाणं असे लाड (?) करायचे. घरात भरपूर पैसा खेळत होता. पण हळूहळू व्यसनंही खेळू लागली. भांडणं वाढली. मारहाण सुरू झाली. त्याचा राग मुलांवर काढला जाऊ लागला. अवीला त्याच्या धाकट्या बहिणीबद्दल खूप माया. आई तिला मारायला लागली की हा आईला मारायला लागला. हिशोब चुकता करण्याच्या नादात बाबा अवीचं समर्थन करू लागले. मग काय.. मुलांना २-२ तास बाथरूम मध्ये कोंडणं, स्वयंपाक न करणं, बाबांनी घरीच न येणं, आले तरी बायकोला मारहाण करणं सुरू झालं. या सगळ्याचा परिणाम म्हणून अविला घरात प्रचंड असुरक्षित वाटू लागले. बाबा मारतात ते बरोबर असेल तर मी मारतो ते चूक का ? असा प्रश्न त्याला पडला.

मार खाऊन अवि एवढा कोडगा बनला की शाळेतल्या शिक्षांचे त्याला काहीच वाटेनासे झाले. मग एक दिवस अवि दिवसभर आणि अर्धी रात्र होईपर्यंत घरी आलाच नाही.

मग जाग येऊन आई त्याला आमच्याकडे घेऊन आली.

या केस मध्ये पहिल्यांदा त्याला होणार्‍या शारीरिक शिक्षा बंद करण्याची गरज होती. मग आईवडिलांच्या नात्यातल्या समस्यांचा मुलांवर होणारा परिणाम त्यांना सकारण पटवून देणे. त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे. अविच्या मनातली असुरक्षितता कमी करण्यासाठी पूर्ण कुटुंबाने काम करणे, त्यासाठी वेळ देणे, आई-अवि, बाबा-अवि, आई-बाबा-अवि, आणि चौघे एकत्र करण्याच्या काही गोष्टींची एक यादी तयार केली.तो त्यांचा गृहपाठ होता.शिवाय त्याच्या शाळेत देण्यासाठी एक रिपोर्ट, शिक्षकांकडून हवी असणारी मदत असा एक पेपर तयार केला.

प्रत्यक्षात वेगळंच झालं. बाबा मला भेटायला यायलाच तयार नाहीत असे अवि म्हणाला. आईची वाटेल ते करण्याची तयारी असली तरी एकटीने काम करून होणार नव्हतेच.
मला खूप असहाय वाटले. समस्या काय आहे ते नेमकेपणाने समजले होते. उपाय स्पष्ट होते. पण बाबा ते स्वीकारायला आणि त्यात मदत करायला तयार नव्हते. शेवटी बाबांचा असहकार ध्यानात घेऊन जमतील त्या गोष्टी करूया असे अविच्या आईने ठरवले आणि त्या डोळे पुसत गेल्या ! इथे एक धडा शिकले. आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या.

त्यामानाने आता विभागात येणारे पालक बरेच सहकार्य करतात. चुका असतिल तर सुधरवण्याचा प्रयत्न करतात. अगदी शहराच्या वेगवेगळ्या भागातल्या शाळांमधून आता केसेस यायला लागल्या आहेत. हा बदल खरंच आशादायक आहे.

काही वेळा मात्र गंमत वाटते. मुलांच्या अती काळजीपोटी येणारे पालकही बरेच असतात. ४ वर्षाच्या मुलाला अंथरुणात शू होणं हा एका आईला फार गंभीर प्रकार वाटला होता. मुलगा एका जागी बसून अभ्यास करत नाही ही तक्रार ८०% पालक करतात. मुलगी ऐकत नाही, वाद घालते, डबा खात नाही, मुलगा सतत टीव्ही बघतो, घरी सगळे येते पण परीक्षेत लिहिता येत नाही, खोटं बोलतो, अमुक एक विषयात गतीच नाही, खूप हुशार आहे पण मार्क्स पडत नाहीत अशा तक्रारी घेऊन पालक येतात.यात खरी समस्या असणारी मुलं फारतर ५ % असतात.

आधी मनात हसू यायचं. पण अनुभवाने ( प्रत्यक्ष आई म्हणून सुद्धा ) कळलं. समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले. त्या किरकोळ वाटणार्‍या समस्येचे निराकरण लवकर झाले नाही तर पालक म्हणून ताण वाढत जातो. खरं म्हणजे प्रत्येक शाळेने पालकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. त्यात मुलांच्या वाढीचे टप्पे, त्या त्या टप्प्यावर होणारे शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक-भावनिक बदल, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या अपेक्षा कराव्या, मुलांच्या पाल्कांकडून काय अपेक्षा असतात या विषयांची माहिती दिली पाहिजे. ही माहिती असलेले पालक खूप कमी असतात कारण आपल्याला हे माहीत असायला हवं हेच त्यांना माहीत नसतं. आणि अजून एक म्हणजे माहिती नसणं हा गुन्हा नाही हे पण मान्य करावं. मग पटकन मदत मागता येते. बदलता येतं.
सहकार्‍यांसोबत होणार्‍या चर्चेत असे विषय अनेकदा येतात तेव्हा पालक प्रशिक्षण हा शालेय व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे ही निकड जाणवते.

अशा केसेस मध्ये पालकांना माहिती देणं, त्यांच्या शंकांना उत्तरं देणं एवढं केलं की कोडं सुटतं. प्रत्येक केस काही सहा सहा महिने चालत नाही. अगदी किरकोळ गोष्ट न कळल्यामुळे मोठी समस्या उभी राहते.

एक उदा: सांगते.
शिशुवर्गात असणारी नीतू सुरुवातीला खूप आनंदात शाळेत जायची. अचानक एक दिवस शाळेत जायचं नाही म्हणून रडायला लागली. असे आठ दिवस झाले, एक महिना झाला तरी रडणे चालूच. शाळा म्हटलं की खूप गप्पा मारणार पण प्रत्यक्ष जायची वेळ आली की भ्यां.....

आई हवालदिल ! बाबा परदेशात. आई समोर बसून रडायलाच लागली !!! प्रत्यक्ष नितूशी बोलताना लक्षात आले की तिचा डबा रोज एक मुलगा खायचा ! आणि ३० मुलांच्या गोंधळात ताईंच्या हे लक्षात आले नव्हते. त्या मुलाला नीतूच्या डब्यावर असलेले चित्र फार आवडायचे म्हणून तो डबा घ्यायचा. स्वतःचा डबा तिला द्यायचा ! पण त्याचा स्टीलचा डबा हिला अज्जिबात आवडायचा नाही !!!! हे समजल्यावर आई, वर्गताई आणि मी कपाळाला हातच लावला ! आता तो मुलगाही रंगीत डबा आणतो. आणि सगळी मुलं आपापला डबा खातायत ना हे नवशिक्या वर्गताई न चुकता तपासतात.... :)

Tuesday, 6 March 2012

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २

२२ एप्रिल २०११

मागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.

ठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला !!!! वर शुभेच्छाही मिळाल्या मला :)

मला खरंच फार वाईट वाटलं. सरांचा व्यासंग जाणवत होता. वयाकडे पाहता अनुभवही उदंड असणार. त्यांची नातवंडं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत याची किंचित खंतही बोलण्यात होती. पण मराठी माध्यमातील शिक्षणावर विश्वासही नव्हता. मग ते मराठी माध्यमातील शिक्षक, अभ्यासक्रम इ वर अगदी निराशाजनक बोलले. मी म्हटलं," सर, मी हे सगळं ऐकूनही आशावादी आहे." तर पटकन अचानक म्हणाले - " मी थकलोय आता. संपूर्ण निराश झालोय... "
हे ऐकून मला कसंतरीच झालं.

विषय बदलून मी माझ्या कामावर आणला. तर उत्तर - " तुझ्या पात्रतेएवढा पगार देणं मला जमणार नाही. शिवाय सध्या संस्थांतर्गत राजकारण एवढं माजलंय की तुला हे लोक कितपत टिकू देतील माहीत नाही. "
हा नकार आहे हे गृहीत धरून पण एका चांगल्या माणसाला भेटल्याच्या समाधानात मी निघाले.

मग एक दिवस वाटलं, परत एकदा सुरुवातीला उमेदवारी केलेल्या शाळेतच परत का जाऊ नये ? खरं तर तिथे पैसे फार कमी मिळणार आहेत. पण त्या क्षणाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं, समविचारी लोक अवतीभवती असणं, कामाच्या पद्धतीत स्वातंत्र्य असणं आणि मुख्य म्हणजे हवा तेवढाच वेळ काम करता येणं या गोष्टी माझी गरज होत्या. परदेशात काढलेल्या चार वर्षात प्रत्यक्ष काम केले नसले तरी अभ्यास, वाचन भरपूर झाले होते. आधीचा अनुभवही पाठीशी होता. पण या गॅपमुळे आत्मविश्वास बोंबलला होता. कामाला सुरुवात झाल्याशिवाय, पकड आल्याची जाणीव झाल्याशिवाय हे आत्मविश्वास नावाचं शिंगरू ताब्यात येणं कठीणंच !

हा सगळा गुंता घेऊन शाळेत गेले. तेच ओळखीचे चेहरे, ओळखीचं वातावरण पाहताना घरी आल्यासारखं वाटलं. सर भेटले आणि कामाला कधी सुरुवात करतेस असा थेट प्रश्न आला.. मला मनातून आनंद झाला. उत्साहाचे कारंजे नाचू लागले. त्यांना हो म्हणाले. सरांनी कामाचे प्लानिंग करताना उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक कामांची आखणी करायला सांगितली.

पूर्वी मी खेळाडूंसाठी काम केलं होतं. आता रेग्युलर शाळेतल्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी करायचं होतं. माझ्यासोबत अजून दोन सहकारी समुपदेशक असणार होत्या.

दोन दिवसात कामाची आखणी, सहकारी मैत्रिणींची ओळख, कामाची विभागणी अशी गडबड झाली.

आज वाटतंय... हेच करण्यासाठी किती आसुसले होते मी...आता नवी सुरुवात. परत एकदा अभ्यासाला लागलं पाहिजे. स्कूल सायकॉलॉजिस्ट! म्हणजे नेमकं काय करता तुम्ही ? असे प्रश्न नेहमीचे. काय करतो आम्ही ? पालकसभेत स्वतःच्या रोल ची ओळख करून द्यावी लागेल. एका कागदावर लिहिले -
स्कूल सायकॉलॉजिस्टची कामे - विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज या सगळ्यांसोबत काम करायचे.

१. भावनिक, वर्तनविषयक आणि समायोजनाविषयक समस्यांशी झगडणार्‍या विद्यार्थ्यांना समूपदेशन करणे
२. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम शैक्षणिक कामगिरी करण्यासाठी मदत करणे, त्यासाठी शिक्षण प्रक्रियेत येणारे अडथळे नेमकेपणाने शोधणे
३. मानसिकरित्या स्वस्थ, निरोगी राहाण्यासाठी संवाद कौशल्य, स्व-नियमन, समस्या निवारण, उद्दिष्ट निश्चिती, स्वयंशिस्त आणि आशावाद शिकण्यास मदत करणे
४. कौटुंबिक समस्या, अपघात, दुर्दैवी घटना अशा परिस्थितीत समायोजन साधण्यास मदत करणे
५. अध्ययन अकार्यक्षमता, भयगंड, न्यूनगंड अशा प्रकारच्या समस्या हाताळणे
६. वरील सर्व कामांसाठी गरज पडेल तिथे विविध मानसशास्त्रीय चाचण्या वापरणे
७. मुलांचे मानसशास्त्र, विकासाचे टप्पे, मुलांच्या अभिक्षमता आणि मूलभूत कौशल्ये यासंदर्भात शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणे, आवश्यक तिथे पालकांचे समुपदेशन
८. विशेष गरजा असणार्‍या मुलांना योग्य त्या तज्ञाकडे पाठवणे.
९. वर्गातील वातावरण निरोगी, आनंददायी आणि प्रेरणादायी ठेवण्यासाठी शिक्षकांना मदत करणे
१०. वेगवेगळ्या सांस्कृतिक परिस्थितीतून आलेल्या आणि भिन्न वातावरणात रुळू पाहणार्‍या मुलांना मदत करणे.

बापरे ! हे सगळं किती आदर्श वाटतं ना !

ह्म्म.. उद्यापासून हे सगळं प्रत्यक्ष करायला सुरुवात. समस्या असणारी मुलं आणि पालक येतीलच. पण मुळात समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काही कार्यक्रम तयार करता येईल का ? शाळेत जसे शारीरिक शिक्षणाचे तास असतात, जिम असते, योगासनं आणि प्राणायाम असतात तसे मानसिक आरोग्य उत्तम रहावे म्हणून काही नियमीत कार्यक्रम आखता येईल का ?

आधी एक ठरवायचं, कोणत्याही संस्थेत राजकारण असणार, चांगल्यासोबत फारसे चांगले नसलेले लोकही असणार, गट असणार, वर्चस्व आणि हेवेदावेही असणार. यात माझी शक्ती मी कमीत कमी घालवेन.
मी मुलांसाठी काम करायला इथे आहे. त्यामुळे आधी मी माझं मानसिक आरोग्य जपेन. आणि अजून एक, मदत मागायला येणारा कोणत्याही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक थरातला असला तरी माझी व्यावसायिक नीतिमत्ता मी जपेन.

जमेन नं ?????