Friday, 21 May 2021

पाण्याकाठचंघर ८.१

आपण जे टिपतो अनुभवतो ते सांगण्यासाठी शब्दांचा सडा घालायचा,पानंफुलं मांडायची, आरास करायची, रांगोळीचे गालिचे भरायचे! अशी धडपड बघणाऱ्या गुणी कवी मित्राने तीच सगळी धडपड सुबक कुपीत अत्तर भरल्यासारखी कवितेत बांधून आपल्याला द्यायची !!! असं अप्रूप वाट्याला आलं म्हणून सृजनाच्या देवाचे आभार मानतेय !!

माझी कालची पोस्ट Chaitanya Dixit च्या या कवितेत नक्की
वाचा !!
आला उन्हाळा कोवळा
त्याचे ऊन मऊसर
घरापुढचे लकाके
त्यात शांत सरोवर !
वास जांभळ्या फुलांचा
व्यापे सारा आसमंत
त्याने उन्हाळ्याचा गंध
होतो अजून श्रीमंत.
सुरी फिरावी लोण्यात
तशी फिरती पाण्यात
वल्ही नाविकांची साऱ्या
एकसूर एक साथ.
काठावरी चार गळ
ध्यान लावून एकांती
अदर्शनेही देवाच्या
आनंदाने चकाकती
पोरापोरींचे पाण्यात
बालसुलभसे खेळ
गृहस्थ नि गृहिणींच्या
हास्य-गप्पांचा नि मेळ
बाळ बदकांचा कल्ला
बदकायांची धांदल
सोडविता सोडविता
त्यांचे बालिश भांडण
दिसभराच्या उन्हाने
तापतापून अंबर
हळूहळू लावू पाही
तिन्हीसांजेला झुंबर
झुंबरात लागे दीप
चंद्रकोरीचा मंदसा
सभोवार होई शांत
नाद दिसाचा बंदसा
साऱ्या दिवसभराच्या
धावपळ-कल्लोळाला
चंद्रकोरीच्या रूपाने
स्वल्पविराम लाभला!

No comments:

Post a Comment