Friday 11 February 2011

एका योगायोगाची मजा

काल काय झालं, सकाळी सकाळी जीटॉक उघडलं तर एक अ‍ॅड रिक्वेस्ट दिसली. नाव काही ओळखीचे वाटेना. ऑनलाईन असलेल्या दोनचार मित्रांना विचारलं तर त्यांनाही नाव नवीन होते. मुलीचे नाव. आत्तापुरते तिला निशा म्हणूया. आडनाव मराठी दिसत होते. ही निशा म्हणजे मायबोली, मिसळपाव, मीमराठी अशा साईटवर एखादा दुसरा आयडी घेउन लिहिणारे कोणीतरी असेल असा विचार करून फार खोलात न जाता मी तिला अ‍ॅड केले.
दुपारी ती ऑनलाईन दिसली. मी 'हाय' म्हटले. थोडावेळ काहीच उत्तर नाही. मग पुन्हा एकदा हलवले. मग बोलायला लागली. मायबोलीवर वाचनमात्र असते आणि माझे लेखन वाचते असे म्हणाली. म्हटलं चला हिच्याशी गप्पा मारूया. म्हणून सुरुवातीला इकडचे तिकडचे विषय सुरू केले. हळुहळू गप्पा रंगल्या. आणि तासभर कितीतरी जुन्या मैत्रिणीशी गप्पा माराव्या अशा गप्पा मारत बसलो दोघीजणी !
ती ही माझ्यासारखीच मायदेशापासून दूर राहाते. डॉक्टरेट मिळाली नुकतीच. आता जॉब शोधतेय म्हणे. साहाजिकच रिकामपणामुळे सध्या औदासिन्य आलंय. आधी लेखन करायचे पण आता काही लिहिताच येत नाही. मायबोलीवर लेखन वाचून खूपदा लिहावं वाटतं. पण प्रत्यक्ष मात्र काही उतरवता येत नाही. सगळा प्रवाह थांबलाय असं वाटतं.

असं बोलता बोलता मी एक दुखरा प्रश्न विचारला. " दिवसभर काय करतेस? "
आता तुम्ही म्हणाल यात काय दुखरं आहे ?
आहे. एक व्यक्ती काहीतरी मिळवण्यासाठी १२-१५ वर्षे सतत धडपडत राहाते. काही काळाने तिला हवं ते मिळतं. आणि याच वेळी एक रिकामपण वाट्याला येतं. पुढचा विचार किंवा मार्ग शोधण्याएवढी शक्ती राहिलेली नसते. त्यामुळे कशाकडे बघून चालायचं ते कळत नाही. मग पावलं थांबतात.
माहीत असतं की ही एक फेज आहे. पण म्हणून हे रिकामपण टाळता येत नाही.

निशाचं असंच झालं. कित्येक वर्षात छंद वगैरेबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे आत्ता काय करायचं हा प्रश्न फार त्रासदायक आहे. जॉब मिळेल पण तोवर काय ? दिवस का उगवला असा विचार करत उठायचं. नवरा कामावर जाईपर्यंत जमेल तेवढं बडबडून घ्यायचं. मग दोन माणसांसाठी करावी लागतील ती कामं करायची. घड्याळ चिडवतं. सकाळचे १० च वाजलेत ! मग कंप्युटरसमोर बसायचं. फेसबुक, ओर्कुट, जीमेल, याहू सगळ्यांचा खरं तर फार कंटाळा आलेला असतो. पण निव्वळ दुसरे काही सुचत नाही म्हणून त्यावर वेळ घालवायचा. मराठी सापडेल तिथे वाचून मराठीची तहान भागवायची. काम उरकल्यासारखं जेवण उरकायचं. झोप काढायची. पुन्हा नेटवर कोणी भेटलं तर गप्पा मारायच्या. भेटणारे सगळे आपापल्या कामाबद्दल बोलतील. तुझं नवां काय चाललंय ते विचारतील. मग आपण परदेशात फार मजेत आहोत असे भासवत गोलमटोल उत्तरं द्यायची... मग याचाही कंटाळा आला की ऑनलाईन पण इन्विजिबल राहून काम करणार्‍या विजिबल लोकांकडे शून्य नजरेने बघत रहायचे. भूतकाळातल्या प्रचंड उत्साही आणि कार्यमग्न असणार्‍या स्वतःला मिस करत आजच्या मी ची कीव करत बसायचे.

काही दिवसांनी अजून वेगवेगळे प्रकार व्हायला लागतात. गप्पा मारता मारता कोणीतरी 'काम आहे' म्हणून ऑफलाईन झालं की चिडचिड होते ! 'तुम्ही काय बाबा, फॉरेनला राहाणारी माणसं, मजा आहे तुमची " अशी मैत्रिणीने केलेली प्रेमळ चेष्टा थेट डोक्यात जाते. मित्राने शेअर केलेले ट्रेकचे फोटो आवडत नाहीत. नवर्‍याने प्रेमाने 'आज काय केलं दिवसभर ? ' असा प्रश्न विचारला तरी डोकं भडकतं. सिंकमधली भांडी हातातून आपटली जातात. हे अन असंच काय काय....

निशा असंच काहीतरी सांगत होती. ते जे सांगत नव्हती ते ही कळत होतं. तिला म्हटलं लिहायला लाग. डोक्यात असलेले विषय लिहून काढ. निदान नावंतरी. मग एकेक विषय घेऊन अगदी चार चार ओळी लिहायला सुरुवात कर. लिहिल्यामुळे मन कितीतरी मोकळं होतं. निदाल साचलेलं सगळं वाहातं होतं.
जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर गाणी ऐकायची. ते जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असोत. वेळ ठरवून आवडती, पूर्वी खूप आवडणारी गाणी ऐकायची. हे सांगितलं नि तिला आठवलं की तिला गाताही येतं ! विसरली होती. असंच कविता करणं, नाचणं सगळं विसरली होती. मग म्हटलं व्यायाम म्हणून अ‍ॅरोबिक्स का ? नाच का नको ??
आठवड्यातून एक दिवस रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. वेगळा आवडता सैपाक, वेगळ्या दुकानात ग्रोसरी शॉपिंग, शहराच्या वेगळ्या भागात फिरून येणं, अगदी अनोळखी लेखकाचं पुस्तक वाचणं, अनोळखी गाणं ऐकणं.
घरकामांना दिनचर्येचं रूप द्यायचं. प्रत्येक काम वेळा ठरवून. जमेल तेवढं मनापासून. हे करता आलं की ' मी काय सध्या धुणीभांडी आणि सैपाकवाली बाईच तर आहे' या सेल्फ टॉकला विश्राम मिळतो.
खूप कामात आणि खूप आनंदात असण्याचे दिवस आता भूतकाळ आहेत तसे हे कंटाळ्याचे रिकामटेकडे दिवसही उद्या भूतकाळ होतील असे रोज एकदातरी स्वतःला सांगायचे.

हे असं काय काय सुचत गेलं ते सांगत गेले. तिला पटलेल्या गोष्टी तिने कोणतेही फाटे न फोडता करेन असे सांगितले . शेवटी म्हणाली," माझा योगायोगांवर विश्वास आहे. आज आपली भेट होणं यामागे काहीतरी चांगलं नक्कीच असणार "....

माझा योगायोगांवर वगैरे विश्वास नाही. पण हे मी तिला सांगितले नाही. एक मायबोली सोडली तर आमच्यात कोणताही दुवा नव्हता. मग ती अ‍ॅड रिक्वेस्ट आपोआप कशी आली हा माझ्याप्रमाणे तिलाही पडलेला प्रश्न आहे.

काहीही असो. तिच्याशी गप्पा मारून मी फ्रेश झाले. कितीतरी गोष्टी स्वता:ला समजावता आल्या ना !!!

4 comments:

  1. :) Chaan vatala ha apala yoga yoga vachun..baryach goshti patalya ani avadalya.... Bhetat rahu ani bolat rahu....
    Vishesh mhanaje ajun ek coincidence - Mi nehami majhya kathanmadhe Nisha naav vaparat hote :)

    ReplyDelete
  2. dhanyavad sakhi !

    tuzyaa navachya arthashi julanare nav mhanun Nisha ghetale. :)

    ReplyDelete
  3. मला काय वाटले ते असे....
    एक गोष्ट आज वाचनात आली ...एक मुलगा आपल्या वडिलाना विचारतो बाबा तुम्हाला पगार किती आहे , ते म्हणतात १०० रु. रोज. तो त्याना ५० रु मागतो आणि आपल्या खोलित जातो वडिल त्याच्या मागे मागे जातात ..त्याला विचारतात कशाला हवेत ...तो त्याची उशी उचलतो त्या खाली भरपूर पैसे साठवलेले असतात वडिल थोडे चिडतात .याच्या कडे एवढे पैसे कोठून आले आणि आहेत तरी मला का मागतो ,,...
    मुलगा वडिलाना १०० रु देतो आणि म्हणतो तुमचा एक दिवस द्याल का मला.
    वडिल विचारात पडतात
    आपले ही असच झाले आहे ....खूप काही मिळवताना आपण कशासाठी मिळ्वतोय तेच विसरुन जातो
    माणस सोबत असणे आणि कोणी तरी आपले ऐकतो....ही भावनाच खूप मोठी असते जीवनात ......
    तुझा योगायोग असाच काही असावा

    ReplyDelete